राज्यातील जनतेची शासकीय कार्यालयांमधील कामे जलद व सुलभ रित्या व्हावीत तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लवकरात लवकर लाभ देता यावा या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये शासनाचे विविध विभाग एकत्रित एकाच ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे काम करत आहेत. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) अंतर्गतही भाजीपाल मिनीकीट वाटपाचा व कृषि स्वयंसहाय्यता गटांच्या स्थापना या योजनेचा पात्र लाभार्थ्यांना जिल्ह्यात लाभ देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी एकाच प्रकारची पिके न घेता त्यात बदल करून विविध प्रकारच्या भाजीपाला लागवडीसाठी त्यांना प्रोत्साहन देणे व त्यामाध्यमातून बाजारामध्ये दर्जेदार भाजीपाला उपलब्ध करुन देण्याच्या दुहेरी उद्देशाने शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणांचे मिनीकीट उपलब्ध करुन दिले जाते. या मिनीकीटमध्ये चवळी, पालक, मेथी, मिरची, भेंडी, शिरी दोडका, चोपडा दोडका, भोपळा, मुळा आणि वाल या भाजीपाला बियाणांचे वाटप केले जाते.
शासन आपल्या दारी अभियनामध्ये जिल्ह्यातील 6 हजार 455 शेतकऱ्यांना या मिनीकीटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील 609, कोरेगाव – 650, खटाव – 580, कराड – 630, पाटण -549, फलटण – 507, माण - 639, वाई – 650, जावली – 635, महाबळेश्वर -566 आणि खंडाळा 440 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.
या भाजीपाला कीटच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन तर घेतले आहेच शिवाय यामध्ये सरळ वाणांचा समावेश असल्यामुळे घरच्या घरी नवीन वाण तयार करणेही त्यांना शक्य झाले आहे.
याशिवाय आत्मामार्फत कृषि स्वयंसहाय्यता गटांचीही स्थापना करण्यात येते व या गटांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्ह्यात आत्मामार्फत 625 गटांची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून कृषि क्षेत्रात महिलांचा सहभाग उत्पादक या नात्याने वाढवण्यावर भर दिला जात आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गटांची स्थापना करण्यात आली आहे. सातारा तालुक्यात 108, कोरेगाव तालुक्यात 60, खटाव तालुक्यात 21, कराड तालुक्यात 73, पाटण तालुक्यात 57, फलटण तालुक्यात 62, माण तालुक्यात 66, वाई तालुक्यात 79, खंडाळा तालुक्यात 50, जावली तालुक्यात 34, महाबळेश्वर तालुक्यात 15 या प्रमाणे गटांची स्थापना करण्यात आली आहे.
शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जलदगतीने योजनांचा लाभ मिळत आहे. तसेच वारंवार कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागत नाहीत. अधिकारी स्वतः गावांमाध्ये येऊन लाभ देत असल्यामुळे याबाबत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासनाचे आभार मानले आहेत. योजनेचा लाभ लवकर मिळत असल्यामुळे शेतीमध्ये केलेले नियोजन योग्य प्रकारे राबवता येत असल्याची भावनाही शेतकरी व्यक्त करत आहेत.
हेमंतकुमार चव्हाण
माहिती अधिकारी , जिल्हा माहिती कार्यालय, सातारा