सोशल मीडियावर खोटी कागदपत्रे बनवून साखर कारखान्याची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कारखान्याच्या प्रशासन विभागातील क्लार्क रणजीत कदम यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार अरुण साळुंखे रा. रेठरे खुर्द ता. कराड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
कराड : सोशल मीडियावर खोटी कागदपत्रे बनवून साखर कारखान्याची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कारखान्याच्या प्रशासन विभागातील क्लार्क रणजीत कदम यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार अरुण साळुंखे रा. रेठरे खुर्द ता. कराड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धावरवाडी येथील जयवंत शुगर कारखान्याच्या प्रशासन विभागात रणजीत कदम हे क्लार्क म्हणून नोकरीस आहेत. २६ जुन २०२१ रोजी रणजीत कदम हे सोशल मीडिया पाहत असताना त्यांना ओमकार साळुंखे यांनी टाकलेली एक पोस्ट दिसून आली. त्या पोस्टमध्ये जयवंत शुगर कारखान्याचे बनावट लेटरहेड, बनावट बिल, बनावट ईन्व्हाईस तसेच त्यावर खोटा जीएसटी क्रमांक होता. तसेच त्या पोस्टवरुन खोटी माहिती प्रसारीत करण्यात आली होती. त्यामुळे रणजीत कदम यांनी याबाबतची माहिती कारखाना प्रशासनाला दिली. सदर प्रकाराबाबत कारखान्याने कदम यांनाच याबाबत तक्रार अर्ज देण्यास नियुक्त केले.
त्यानुसार ३१ जुलै २०२१ रोजी कदम यांनी याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. पोलिसांनी ओमकार साळुंखे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सोशल मीडियावर आलेली पोस्ट आपल्या अकाऊंटवरुन पुढे सोशल मीडियावर टाकल्याचे सांगीतले. सदर पोस्टद्वारे कारखान्यासह शेतकरी आणि सभासदांची बदनामी केल्यामुळे रणजीत कदम यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी २६ रोजी ओमकार साळुंखे याच्याविरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.