फलटण : धैर्य टाईम्स
आजपासून सुरू होणाऱ्या महसूल विभागाच्या सेवा पंधरवडा अभियानाचा शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत राजाळे या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
१७ सप्टेंबर २०२५ ते दिनांक १९ सप्टेबर २०२५ पर्यंत विशेष ग्रामसभा आयोजीत करुन ग्रामसभेची मान्यता घेतली जाणार आहे. त्यातूनही विवादग्रस्त अथवा अतिक्रमणग्रस्त राहिलेल्या स्त्यांबाबत तहसिलदार यांचे स्तरावर रस्ता अदालत आयोजित करून सामोपचाराने कार्यवाही करण्यात येणार आहे. यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सदर सर्व रस्त्यांचे सीमांकन करुन सर्व रस्ते नकाशात दर्शवून अभिलेखात त्यांची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच याबाबत स्थानिक स्तरावर सर्व लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तसेच या योजनेच्या दुस-या टप्यात दिनांक २२/०९/२०२५ ते ३०/०९/२०२५ दरम्यान "सर्वांसाठी घरे" योजने अंतर्गत ग्रामविकास विभागाने सर्वेक्षण करुन अंतिम केलेल्या व शासकीय नियमाप्रमाणे पात्र असलेल्या व्यक्तींना शासकीय जागेचे पट्टे दिले जाणार असून पात्र व्यक्तींचे २०० चौ.फु. पर्यंत अतिक्रमण विहित अटीशर्ती मान्य असल्यास नियमानुकूल केले जाणार आहे. याचा लाभ भूमिहीन अथवा बेघर लोकांना होणार आहे. या दोन्ही टप्यांमध्ये ई पिक पाहणी जनजागृती व अॅग्रीस्टॅक नोंदणी देखील केली जाणार आहे. तसेच भटक्या विमुक्त समाजास व कातकरी समाजास विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करणेत येणार आहे.
अॅग्रीस्टॅक नोंदणी, छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान, वारसनोंदी अद्यावत करणे तसेच जिवंत ७/१२ उपक्रमासाठी एकूमँ, अ.पा.क नोंदी कमी करणे लक्ष्मी मुक्ती योजना राबविण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या अनुषंगाने संपूर्ण तालुक्यात "सेवा पंधरवडा" साजरा केला जाणार असून महसूल विभागा सोबतच, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, पोलीस विभाग व इतर शासकीय कार्यालये या सर्वांच्या सहकार्याने सदर मोहिम यशस्वीपणे राबविण्याचे प्रथम प्रयत्न प्रशासनाचे राहणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.