फलटण प्रतिनिधी :- स्वच्छ भारत योजनेच्या नावाखाली स्वच्छतेचा नारा देत फलटण शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून उपाय योजना आखल्या जातात यासाठी मोठा लाखोंचा निधीही खर्च होता. परंतु, शहरातील स्वच्छतेची परिस्थिती पाहिली तर स्वच्छता नक्की होते कुठं, असा प्रश्न पडतो. शहरात सध्या अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असून आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे.
साचलेल्या कचऱ्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास
फलटण नगरपरिषद दर वर्षी स्वच्छ भारत मोहीम जाहीर झाल्यावर स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात करते. स्वच्छता मोहिमेचा मोठा गाजावाजा करते मात्र, फलटण शहराची आजची परिस्थिती पाहिली तर अनेक भागात कचऱ्यांचे ढीग पाहायला मिळत आहेत. शहरातील हडको, संजीवराजे नगर, विमानतळ परिसर, विवेकानंद नगर या परिसरामध्ये अनेक महिने पडलेल्या कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत.
हडको व संजीवराजे नगर येथील विंचुर्णी जाधववाडी रोड लागत शिळे अन्न, प्लॅस्टिक कचरा, यासह अन्य घातक कचरा देखील पाहायला मिळत असून यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. येथील कचरा लवकरात लवकरात लवकर साफ करावा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
विमानतळ परिसरात सकाळी व सायंकाळी मोठया संख्येने नागरिक फिरायला येत असतात तसेच या रोडला असलेल्या शाळेमुळे लहान मुलांची व पालकांची ये जा होत असते याच ठिकाणी खुल्या जागेत साचलेल्या कचऱ्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच या भागात राहणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
"स्वच्छता कर्मचारी दाखवा व बक्षीस मिळवा"
लाखो रुपये खर्चून नगर परिषदेने घंटागाडी सुरू आहेत. स्वच्छते मोहिमेसाठी अनेक कर्मचारी देखील नगर परिषदेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. कचरा उचलण्यासाठी वेगवेगळे वाहन देखील उपलब्ध आहेत. पण हडको व संजीवराजे नगर येथील विंचुर्णी जाधववाडी रोड याभागात नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी कुठेही कचरा उचलताना अथवा साफसफाई करताना दिसून येत नाहीत. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी "स्वच्छता कर्मचारी दाखवा व बक्षीस मिळवा" अशी योजना सुरू करण्याची आवश्यकता आहे.
मात्र, शहरातील हडको व संजीवराजे नगर येथील विंचुर्णी जाधववाडी रोड परिसरामध्ये बेजबाबदार नागरिकांमुळे कचऱ्यांचे मोठमोठे ढीग साचले आहेत. सदरचा कचरा सडल्यामुळे अधिक दुर्गंधी परिसरामध्ये पसरत आहे. अनेक नागरिक घंटागाडीत कचरा न टाकता, शहरातील वर्दळ असणाऱ्या ठिकाणी किंवा रस्त्यावर आणून टाकतात. यामुळे कचऱ्याचे ढीग दिसून येतात.
खर्च दाखवून कागद रंगवण्याची वेळ आली
शहरातील विविध कामांमुळे नावाजलेल्या नगर परिषदेचे स्वच्छता कामाचे तीन तेरा उडाले असून हडको व संजीवराजे नगर येथील विंचुर्णी जाधववाडी रोड लगत घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या कडे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी संपूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा उडाले आहेत. उठा उठा स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची घोषणा झाली खर्च दाखवून कागद रंगवण्याची वेळ आली. या धर्तीवर फलटण नगर परिषदेचा कारभार सुरू आहे. कागदावरच योजना रंगवून दाखवण्याऐवजी प्रत्यक्षात स्वच्छता मोहीम राबवण्याची आवश्यकता असल्याची बाब नागरिक बोलून दाखवत आहेत.