जनता हाच आपला पक्ष व त्यांची सेवा हाच आपला धर्म मानून कोणताही राजकीय स्वार्थ नबाळगता सत्ताधाऱ्यांवर आपल्या बुद्धी कौशल्याने अंकुश ठेऊन खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावून अन्यायावर पेटून उठणारे व्यक्तिमत्व म्हणजे फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम. ६ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त क्रांतिकारी योद्धा म्हणून ज्यांची समाजात वेगळी ओळख आहे असे ॲड. नरसिंह निकम यांच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर व जबर इच्छाशक्तीच्या आधारे ॲड. नरसिंह निकम यांनी स्वतःची खास प्रतिमा तयार केली आहे. बलाढ्य राजकीय शक्तीविरूद्ध लढताना तसूभरही आपल्या ध्येयापासून विचलीत न होता 'सत्य' हेच 'अंतिम ध्येय' ठेवून कोणताच राजकीय तह ॲड. नरसिंह निकम यांनी कधीच केली नाही. खरे तर हीच त्यांची खरी ताकद व जमेची बाजू.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मातीतून कर्तबगार माणसे घडविली. महाराजांनी मूठभर मावळे हाताशी धरून स्वराज्याची स्थापना केली. परंतु त्यांनी प्रथम माणसे घडविली व नंतर किल्ले बांधले. सेना व आरमार उभे केले. खरे तर ॲड. नरसिंह निकम यांच्याविषयी सुद्धा हेच बोलावेसे वाटते की, ते सुद्धा आज माणसे घडविण्याचे काम करताहेत. राजकीय शक्तीला बळी न पडता त्याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी लोकांना सामर्थ्य देण्याचे काम आज ॲड. निकम करीत आहेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणाऱ्या राजकीय परिस्थितीत जनतेला बोलायला लावून अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याचे काम ॲड. निकम यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम त्यांच्या हातून होत आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आंदोलनाच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ॲड. निकम यांनी वेळोवेळी केले आहे. ऊसाच्या दराचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, शहरातील व्यापाऱ्यांचा प्रश्न असेल सुरक्षिततेचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांवर पेटून उठून सर्वांच्यापुढे राहून या प्रश्नांना न्याय मिळवून देताना खऱ्या अर्थाने समाजासाठी झिजण्याचे काम ॲड. नरसिंह निकम यांनी केले आहे.
वकीली व्यवसायातून कोट्याधीश झालेले अनेक वकील आज आपण समाजात पाहतो. परंतु वकीली पेशातून पैशांची अपेक्षा न ठेवता गरीबांना न्याय देवून वकील या नावाला वेगळी उंची ॲड. नरसिंह निकम यांनी प्राप्त करून दिली आहे.
बहुतेक माणसे स्वतःकरीता जगत असतात याचे कारण स्वार्थ हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. इतरांचे जीवन सुखी करण्यासाठी फार थोडी मंडळी न मळलेली वाट शोधतात. ज्या मार्गान फारसे कुणी गेलेले नसते. अशा आडवळणाने जावून स्वतःच्या आयुष्याला जे वळण देतात अशा वळणदार माणसांमध्ये ॲड. नरसिंह निकम यांचे नाव अग्रक्रमाणे घ्यावे लागेल.
स्वार्थाने बरबटलेल्या राजकीय मंडळींना 'निकम झटका' देवून अनेकांना वटनीवर आणण्याचे काम वकीलांनी चोख बजावले आहे. श्रीराम कारखाना जमीन विक्री प्रकरण असेल व अधिकाऱ्यांविषयी उच्च न्यायालयापर्यंतची धाव असेल हे प्रत्येक काम अभ्यासपूर्ण व बारकाईने करण्याचे ॲड. नरसिंह निकम यांचे वेगळे वैशिष्ट्य आहे.
ॲड. नरसिंह निकम यांनी न्यायालयामध्ये फौजदारी व दिवाणी खटले चालविले त्यापेक्षा अधिक काळ त्यांनी आपल्या गावाची व तालुक्याची वकीली केली. न्यायालयात वकीली करताना त्यांनी पक्षकाराशी इमान हे आपल्या व्यवसायाचे ब्रीद मानले. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सतत न्याय मिळवून दिला. समाजातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे काम ते जाणीवपूर्वक करतात.
सार्वजनिक जीवनामध्ये सरळमार्गी चालणाऱ्या ॲड. नरसिंह निकम यांना राजकारणातील काही दृष्ट प्रवृत्तींनी अडथळे निर्माण केले. तरीही त्यांनी त्याच जिद्दीने व ताकदीने जनसामान्यांचा पाठींबा मिळवून आपले वेगळेपण सिद्ध केले.
ताठ मानेने कसे जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून ॲड. नरसिंह निकम यांच्याकडे पाहता येईल. खेकड्याची वृत्ती सोडून देण्याची मानसिकता ठेवून व्यापक सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तरच राजकीय वनवासातून सर्वसामान्यांना सुटका आहे हा संदेश ॲड. निकम समाजाला देतात.
ॲड. निकम यांच्या वाढदिनी प्रभूरामचंद्रांकडे एवढेच साकडे की, जनतेच्या या क्रांतीकारी योद्ध्याला उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो व भविष्यात राजकारणातील मोठे यश त्यांना लाभो..