फलटण प्रतिनिधी :
श्रीदत्त इंडिया प्रा. लि., यांच्या साखरवाडी, ता. फलटण येथील साखर कारखान्याने आगामी सन २०२५ - २६ यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यादृष्टीने कारखान्याची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून तोडणी व वाहतूक यंत्रणा करार प्रक्रिया पार पडली आहे. मागील ५ गळीत हंगामात शेतकऱ्यांना वेळच्यावेळी दिलेल्या चोख ऊस पेमेंट मुळे १२ लाख टन गाळप होण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी केले आहे.
श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी, ता. फलटण येथील साखर कारखान्याच्या ६ व्या गळीत हंगामातील ऊस मोळी, गव्हाण पूजन व गळीत हंगाम शुभारंभ श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटणचे अध्यक्ष प. पू. महंत श्यामसुंदर शास्त्री विद्वांस, श्री दत्त इंडिया प्रा. लि., चे संचालक चेतन धरु, कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी चीफ इंजिनिअर अजित कदम, डेप्युटी चीफ इंजिनियर नितीन रणवरे, असिस्टंट जनरल मॅनेजर नितीन नाईक नवरे, को - जन मॅनेजर दिपक मोरे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, सीनियर इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर नितीन सुद्रिक, एच. आर. सुहास भुसनर, डेप्युटी चीफ इंजिअर किशोर फडतरे, सुरक्षा अधिकारी अजय कदम, पैलवान संतोष भोसले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, सुहास गायकवाड, केन सुपरवायझर एस. के. भोसले, ट्रान्सपोर्ट इनचार्ज नितीन भोसले, परीसरातील शेतकरी, कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अजितराव जगताप म्हणाले, मागील हंगामा पासून कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून दैनंदिन ८ हजार ५०० क्षमतेने कारखान्याचे गाळप होणार आहे. कारखान्याने प्रत्येक वर्षी स्पर्धात्मक ऊस दर आणि वेळेत ऊस पेमेंट केले असून शासन निर्णयानुसार कारखाना गाळप सुरु करणार आहे. गाळप क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांच्या ऊसाचे वेळेत गाळप होण्यास मोठी मदत होणार असल्याने फलटण तालुक्यातील व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी श्री दत्त इंडिया कारखान्यास घालण्याचे आवाहन त्यांनी केले.











