दुचाकी व चारचाकी वाहनामध्ये मॉडिफिकेशन करून, जास्त आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसविण्याचे तसेच चारचाकी वाहनात कर्कश आवाजाची साऊंड सिस्टीम बसवून फलटण शहरात सुसाट वेगात फेरफटका मारण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. चक्क उपविभागीय पोलीस अधिकारी व फलटण शहर तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरच या गाड्या फेरफटका मारत असतात परंतु अशा वाहनांवर स्थानिक पोलीस व वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कारवाई करत नसल्याने फलटणकराच्यात कमालीचा नाराजीचा सूर उमटत आहे.
बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलीसांची आहे; तशीच ती 'आरटीओ'चीही आहे. मात्र, चक्क ठाण्याच्या बाहेरील रोडवरील 'मोटार वाहन कायद्या'चे उल्लंघन करणाऱ्यांवर गाड्यावर कारवाई करण्यात 'आरटीओ' हतबल ठरल्याचे चित्र आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून 'बुलेट राजां'चे प्रस्थ वाढले आहे. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून किंवा वेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसवून त्यातून फटफट आवाज ऐकून कानठळ्या बसतील असा आवाज काढण्याचे प्रकार तरुणांमध्ये भलतेच लोकप्रिय झाले आहेत. या आवाजामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालक, पादचारी जेरीस आले आहेत. त्यामुळे नियमबाह्य पद्धताने वर्तणूक करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी सातत्याने होत आहे ही कारवाई प्रामुख्याने वाहतूक पोलीसांकडून केली जाते परंतु शहरातील वाहतूक विभाग नको त्या कारवाई करण्यात रमलेला असल्याने बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच फावत आहे.
फलटण शहरात रोडरोमिओं वाहनचालक
मॉडिफिकेशन केलेल्या चारचाकी वाहनात कर्कश आवाजाची साऊंड सिस्टीमचा आवाज वाढवत फेरफटका मारतात. यातच भर म्हणून दुचाकीवरून कानठळ्या बसतील असे फटफट आवाज काढणारे सायलेन्सर आणि हॉर्न वाजवत तरुण मंडळी भर टाकतात या आवाजाच्या त्रासाने नागरिक पुरते हैराण झाले असून पोलीस विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने या प्रकाराला आळा बसण्याऐवजी आणखी वाढत असल्याचे चित्र आहे.
सध्याला उन्हाळ्याचे दिवस असल्याने सायंकाळी माळजाई परिसर, विमानतळ परिसर तसेच रिंगरोड या ठिकाणी अनेक वृद्ध व महिला लहान मुले फिरण्यासाठी येत असतात याचवेळी काही चालक सुसाट वेगात आवाज करीत दुचाकी व चार चाकी वाहने चालवत असल्याने नागरिकांना याचा फार मोठा त्रास होत आहे. पोलीस विभागाकडून अनेक दिवसापासून अशा कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने फलटण शहरात अशा मोडिफिकेशन गाड्यांचे प्रमाण वाढले आहे याचाच त्रास सामान्य नागरिकांना बसत आहे शहर व ग्रामीण पोलीसांनी अशा गाड्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.