चांदनी चौक ते मंगळवार तळे रस्त्याच्या खडीकरणाचे काम ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे रेंगाळले आहे . नगरसेवकांकडून पाठपुरावा होऊनही केवळ कामाच्या सबबी दिल्या जात असल्याने सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होऊ लागली आहे .
सातारा : चांदनी चौक ते मंगळवार तळे रस्त्याच्या खडीकरणाचे काम ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे रेंगाळले आहे . नगरसेवकांकडून पाठपुरावा होऊनही केवळ कामाच्या सबबी दिल्या जात असल्याने सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होऊ लागली आहे .
शहराच्या पश्चिम भागात ऐतिहासिक मंगळवार तळे आणि त्याच्यालगतच्या परिसरात पोहचण्यासाठी राजवाडा चौक ते मंगळवार तळे हा एकमेव रस्ता आहे . या रस्त्यावर प्रतापसिंह महाराज भाजी मंडई , तसेच छोटी मोठी व्यापारी दुकाने असून या मार्गावर सातत्याने कायमच वर्दळ असते . या मार्गाची उन्हाळ्यात भुयारी गटार योजनेच्या कामानिमित्त जे खोदकाम झाले त्यामुळे अक्षरशः वाट लागली आहे. अनंत इंग्लिश स्कूलच्या चौकात भुयारी गटार योजनेचे चेंबर वर येऊन रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आलेली खडी निघून गेली आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा समतलपणा निघून गेल्याने छोट्या मोठ्या अपघातांनी नागरिक घायकुतीला आले आहे. येथील मंगळवार तळे चौकात काही दिवसापूर्वी मोरे कॉलनीतील एक महिला दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मुका मार लागून जखमी झाली. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहराच्या पश्चिम भागात रस्त्यांची जी वाट लागली आहे त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
मात्र या संतापाचा कडेलोट होण्याची वेळ आता आली आहे. मंगळवार तळे रस्त्याच्या खडीकरणाला नगरोत्थान च्या अनुदान योजनेतून पन्नास लाख रुपये मंजूर असून या कामाचा ठेका एका ठेकेदाराला देण्यातही आला आहे. मात्र ठेकेदारांवर ना मुख्याधिकारी ना पदाधिकारी या कोणाचेच नियंत्रण नसल्याने ठेकेदारांना कोणाचेच भयं उरले नाही. भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारांना रस्त्यांच्या मधोमध चेंबर बनविण्यासाठी जी खुदाई केली त्याचे पॅचिंग करून देणे गरजेचे होते. मात्र दरम्यानच्या काळात बांधकाम सभापती सिद्धी पवार व ठेकेदाराच्या व्यवस्थापकाची प्रचंड वादावादी झाल्यापासून खडीकरणाच्या कामाने अक्षरशः मानचं टाकली. पहिल्या ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध करावयाचे पॅचिंग न केल्याने मी पुढचे पॅचिंग करू शकणार नाही अशी भूमिका सध्याच्या ठेकेदाराने घेतल्याने रस्ते दुरुस्तीचा सावळा गोंधळ समोर आला आहे. दोन ठेकेदारांमधील विसंवाद आणि त्यावर बांधकाम विभागाचे नसणारे नियंत्रण त्यातही कठोर कारवाई करण्यापेक्षा बोटचेपी भूमिका घेणारे पालिका प्रशासन यामुळे ठेकेदारांच्या मनमानीचा भुर्दंड नागरिकांना कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. किमान पदाधिकार्यांची मुदत संपण्यापूर्वी रस्ते खडीकरणाच्या कामाला गती दिली जावी अशी मागणी मंगळवार तळे रस्ते परिसरातील नागरिक करत आहेत.











