सातारा दि.1 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ही शेतकऱ्यांच्या प्रगतीची पर्वणी असून विशेष करुन युवा शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांनी केले.
कृषि विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. या प्रसंगी कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, देगावच्या मेगा फूड पार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चोले, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक स्वाधीन कदम आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात विविध प्रकारची अन्नधान्य, फळपिके पिकवली जात असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, युवा शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग उभारुन कृषि क्षेत्राला नवी दिशा द्यावी. त्यासाठी मागणी असलेले पण बाजारामध्ये कमी उपलब्ध असलेले पदार्थ तयार करावेत. तयार केलेल्या उपपदार्थांचे छोटे छोटे आकर्षक पॅकिंग करुन ग्राहकाला परवडतील अशा किंमती जर ठेवल्या तर विक्री व्यवस्थेत सुलभता येऊ शकते. त्यासाठी कृषी विभाग सर्वातोपरी सहाय्य करेल.
कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मास्टर ट्रेनर लिनेश निकम यांनी शेतकऱ्याना सहज करता येऊ शकणाऱ्या प्रक्रिया उदयोगांची माहिती दिली.
याप्रसंगी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतील उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायासंबंधी माहिती दिली. तसेच श्री. चव्हाण यांनी प्रक्रिया उदयोग उभारणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या ही जाणून घेतल्या.
या कार्यक्रमास जिल्हयातील प्रक्रिया उदयोग करु इच्छिणारे आणि प्रक्रिया उदयोगांमध्ये सहभागी शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हासंसाधन व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केली. तर आभार कृषि उपसंचालक संतोष बरकडे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन कृषि सहाय्यक अंकुश सोनवले यांनी केले.