फलटण प्रतिनिधी :-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “माझी माती माझा देश” या राष्ट्रीय अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार असून फलटणच्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे
नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी संजय गायकवाड बोलत होते. यावेळी कार्यालयीन अधिक्षक मुस्ताक महात, विनोद जाधव , शिरतोङे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या व वीर सैनिकांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नगर पालिका स्तरावर “माझी माती माझा देश” या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवायचे आहेत. यामध्ये शहीद आणि वीरांचा नामोल्लेख असलेला शीलाफलक बसवायचा आहे. तसेच विशेष कार्यक्रम आयोजित करून मातीचे दिवे अथवा माती हातात घेऊन पंचप्राण प्रतिज्ञा घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ७५ देशी वृक्षारोपांची लागवड करीत अमृत वाटिका निर्माण करावयाची आहे. तसेच राष्ट्रध्वजारोहण व राष्ट्रगान करावयाचे आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नगर पालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये अभियानातर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आले.
आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या वीरांप्रती आपल्या मनात असलेली अत्यंत आदराची व अभिमानाची भावना व्यक्त करण्यासाठी नगर पालिकेच्या वतीने “माझी माती माझा देश” या अभियानांतर्गत शिलाफलक अनावरण दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषद फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे तसेच वसुधा वंदन ७५ देशी वृक्षारोपांची लागवड करीत अमृत वाटिका कार्यक्रम दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११:४५ वाजता जलशुद्धीकरण केंद्र सोमवार पेठ फलटण येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सर्वच कार्यक्रमांत देशभिमानी, फलटणच्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.