छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे व सर्वप्रथम शिवरायांची जयंती साजरी करणारे समाजक्रांतिकारक जोतीराव फुले यांची कटगुण ही कुलभूमी आहे. त्यांच्या पत्नी अर्थात भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचे यांचे नायगांव ही जन्मभूमीही याच जिल्ह्यात आहे. सातारच्यादृष्टीने या दोन्ही गोष्टी अभिमानास्पद व गौरवपूर्ण अशाच आहेत.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे व सर्वप्रथम शिवरायांची जयंती साजरी करणारे समाजक्रांतिकारक जोतीराव फुले यांची कटगुण ही कुलभूमी आहे. त्यांच्या पत्नी अर्थात भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचे यांचे नायगांव ही जन्मभूमीही याच जिल्ह्यात आहे. सातारच्यादृष्टीने या दोन्ही गोष्टी अभिमानास्पद व गौरवपूर्ण अशाच आहेत. यापूर्वी नायगांव येथे शिल्पसृष्टी साकारुन सावित्रीमाईंच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्याचे काम शासनाने केले. परतु, जोतीराव फुले यांच्या कटगुण या कुलभूमीत मात्र शिल्पसृष्टी अद्यापही साकारली नाही. ७ ते ८ वर्षापूर्वी कटगुणच्या शिल्पसृष्टीबाबत प्रशासन स्तरावर चर्चा झाली, तथापि या चर्चेला मूर्तरुप आले नाही. खरंतर, ही बाब खेदजनक आहे. ज्या फुले दांम्पत्याचा वारसा हा सातारा जिल्हा मोठ्या अभिमानाने महाराष्ट्रभर सांगतो, त्या जिल्ह्यातील चक्क जोतीरावांच्या कुलभूमीत शिल्पसृष्टी होत नाही, हा एका अर्थाने जोतीरावांचा घोर अवमान आहे आणि तो आपण सहनही करतोय. त्यामुळे आतापर्यंत झाले हे खूप झाले. यापुढे जिल्हा प्रशासनाने शिल्पसृष्टीबाबत उदासिनता न दाखवता ठोस पावले उचलून दोन कोटींची तरतूद करावी आणि ती उभारावी, असा आग्रह अरुण जावळे यांनी शासनाकडे धरला आहे. यासंबधी जिल्हाधिकारी यांना जावळे यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात अरुण जावळे यांनी असे नमूद केले आहे की, जोतीराव फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील मूलगामी समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्यप्रवर्तक होत. कर्जबाजारपणापायी हैराण झालेल्या शेतक-यांची गा-हाणे फुले यांनी वेशीवर टांगली. समाजातील अगदी शेवटच्या तळाच्या थरातील माणसांच्या दुःखाशी समरस होऊन सामाजिक न्यायाच्या आणि समतेच्या त्यांनी चळवळी केल्या. न्याय आणि समता यावर आधारलेली समाजरचना अस्तित्वात आणण्याचा ध्येयवाद फुले दांम्पत्याने अंगीकारला व जपला. इतकेच नव्हेतर त्यासाठी ते अखेरपर्यंत झटले. १८४८ ला मुलींची पहिली शाळा सुरू करून जोतीरावांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. स्त्री ही एक समाजाचा स्वतंत्र घटक आहे असून तीला प्रतिष्ठा आहे. मानवी नैसर्गिक हक्क - अधिकार तीला मिळाले पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला. १८६९ ला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवरायांचे कार्यकर्तृत्व त्यांनी जगापुढे आणले. याशिवाय सतीची चाल, बालविवाह, केशवपन अशा अनिष्ट रुढी - परंपरा विरोधात प्रखर बंड छेडले. या एकूण लढ्यात स्वतः सावित्रीमाई फुले सावलीसारख्या जोतीरावांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या, त्यामुळे तर फुले दांम्पत्याचे 'क्रांतिकारकत्व' समग्र समाज परिवर्तनाच्या चळवळीला विशिष्ट आयाम देणारे ठरले. सामाजिक उत्थानाच्या कार्यामुळे फुले दांम्पत्याचा आदर केवळ महाराष्ट्रच करत नाही, तर देशभर केला जातो. सातारा जिल्हाप्रशासनानेही कुलभूमीत शिल्पसृष्टी साकारुन फूलेंचा आदर करावा.
अडीच - तीन वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी जोतीराव फुले यांना भारतरत्न बहुमान मिळावा यासाठी केंद्र सरकारजवळ आग्रह धरला होता.मुख्यमंत्र्यांचा हा आग्रह स्वागतार्ह असला तरी फुले यांना अद्याप भारतरत्न दिला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक भारतरत्न मिळण्याबरोबरच कूलभूमीत जोतीरावांची शिल्पसृष्टी साकारावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी, यासंबंधी पत्रव्यवहारही यापूर्वी झाला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री ना. रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बडोले यांच्याशी सविस्तर चर्चाही केलेली आहे. रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिल्पसृष्टीबाबत त्यांच्याजवळही आग्रह धरला होता. अलिकडेच विद्यमान पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनाही निवेदन दिले आहे. मात्र आद्याप ठोस हालचाल झालेली दिसत नाही. खरतंर, जिल्हाप्रशासनाने शिल्पसृष्टीचा प्रस्ताव तयार करुन मंत्रालयाकडे एव्हाना पाठवायला हवा होता. मात्र शिल्पसृष्टीचा विषयच चर्चेत आणायचा नाही असे धोरण राबवून जिल्हाप्रशासन शिल्पसृष्टीला बगल देत असल्याची शंका येऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शिल्पसृष्टीचा प्रश्न पुढे येत नसल्यामुळे मंत्रालयस्तरावर शिल्पसृष्टीला कसलाही वेग येत नाही. इच्छाशक्तीचा अभाव आणि शिल्पसृष्टीबाबत कमालीची उदासिनता जिल्हाप्रशासनाची दिसून येत आहे. आता यापुढे मात्र जिल्हाप्रशासनाने शिल्पसृष्टीबाबत उदासिनतेची व वेळकाढूपणाची भूमिका घेऊ नये. शिल्पसृष्टीचे प्रारुप लवकरात लवकर मंत्रालयाकडे सादर करुन शिल्पसृष्टी असित्वात आणण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा जिल्ह्यातील फुलेवादी विचारप्रवर्तकांडून सत्याग्रहाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा अरुण जावळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाप्रशासनाला दिला आहे.











