सातारा, दि. 24 :- बँकांनी सामाजिक जबाबदारी समजुन केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचे सर्वसामान्य व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
जिल्हा अग्रणी बँकेच्या बँकर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नरेंद्र कोकरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपअचंल प्रबंधक श्रीकृष्ण झेले, नाबार्डचे महाप्रबंधक राजेंद्र चौधरी, अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंचल पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक उमेश दंडगवाळ उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, अग्रणी बँकेने चालु वर्षासाठी 8 हजार 750 कोटींचा पतपुरवठा प्राथमिक क्षेत्रासाठी तयार केला असून त्यापैकी राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खाजगी बॅंकांद्वारे 6 हजार 684 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. सर्व बँकांनी या वर्षात 100 टक्के उद्दिष्ठ पुर्तीसाठी प्रयत्न करावेत अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.
अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील यांनी सन 2023-24 च्या पत आराखड्याविषयी माहिती देतांना सांगितले, प्रथामिक क्षेत्रासाठी 9 हजार 400 कोटी रुपये पैकी कृषि क्षेत्राकरित 5 हजार कोटी, उद्योग व्यवसायाकरिता 1 हजार 855 कोटी व इतर प्राथमिक क्षेत्रासाठी 2 हजार 545 कोटी रुपये इतक्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उद्दिष्टामध्ये 650 कोटींची वाढ करण्यात आली आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नरेंद्र कोकरे यांनी बँकेच्या ठेवी व कर्जाबाबत आढावा घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीमती पाटील यांनी नवीन राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियानाबद्दल माहिती देऊन सर्व बँकांनी योजने अंतर्गत यावर्षी बचत गटांचे उद्दिष्ट साध्य करण्याविषयी सूचना दिल्या. जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक उमेश दंडगवाळ यांनी CMEGP व PMEGP या दोन्ही योजनांचा आढावा घेऊन उद्दिष्ट साध्य करण्याविषयी सूचना दिल्या. यावेळी जिल्हा उद्योग केंद्र व विविध शासकीय विभागांचे व महामंडळांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

















