फलटण प्रतिनिधी- मौजे वाखरी, ता. फलटण जि.सातारा येथील यात्रेचे अनुषंगाने गावातील
दोन्ही गटाचा वाद मिटत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून दिनांक १२ एप्रिल २०२३ ते ते १७ एप्रिल २०२३ पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश पारित करण्यात आले आहेत.
कलम १४४ नुसार यात्रेतील कार्यक्रमास पुजारी - मानकरी सोडून इतर लोकांना मनाई करण्यात आली आहे. तसेच देवाचा छबीना काढण्यास मनाई करण्यात येत असून, सदर कालावधीमध्ये मौजे वाखरी गावामध्ये कोणतेही करमणूकीचे कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत असे आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी पारित केले आहेत.
वाखरी गावातील यात्रा ही दिनांक १२ एप्रिल २०२३ ते ते १७ एप्रिल २०२३ रोजी साजरी होणार आहे. सदर गावातील यात्रेवेळी दोन्ही गटात भांडणे होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने गावातील दोन्ही गट हे एकमेकांचे ऐकण्याचे स्थितीत नसल्याने दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण याठिकाणी सदर प्रकरणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून समन्वय बैठक आयोजित करण्यात आलेली होती. दिनांक २२ मार्च २०२३ रोजी गुडीपाडव्यादिवशी गावकरी यांची यात्रेसंबंधाने पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचेमार्फत मिटींग गावात घेणेत आली. सदर मिटींगला वाखरी गावातील दोन्ही गटाचे ३०० ते ४०० लोक उपस्थित होते. सदर मिटींगवेळी गावकरी यांचेसमोर यावर्षी यात्रेला सर्वांची वर्गणी घ्यायची का असा विषय निघाला असता दोन्ही गटाचे लोकांनी गोंधळ घातला दोन्ही गटात किरकोळ भांडणे झाली. त्याअनुषंगाने गावात दिनांक २२ मार्च २०२३ रोजी रात्रभर पोलीस बंदोबस्त ठेवणेत आलेला होता. तसेच उपविभागीय अधिकारी फलटण, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, तहसिलदार फलटण, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचेसमवेत दोन्ही गटातील ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तरीही दोन्ही गटातील समझौता न झाल्यामुळे वाखरी गावातील यात्रेस देवाची हळदीचा कार्यक्रम, देवाचे लग्नसोहळा व करमणूकीचे कार्यक्रम होत असल्यामुळे सदर गावातील यात्रेवेळी दोन्ही गटात भांडणे होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे मौजे वाखरी गावातील दिनांक १२ एप्रिल २०२३ ते १७ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या यात्रेस देवाची हळदीचा कार्यक्रम, देवाचे लग्नसोहळा या कार्यक्रमास मंदिरातील पुजारी व मानकरी वगळून सदर कार्यक्रमास इतर लोकांना मनाई करण्यात येत आहे. तसेच देवाचा छबीना काढण्यास मनाई करण्यात येत आहे. सदर कालावधीमध्ये मौजे वाखरी गावामध्ये कोणतेही करमणूकीचे कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत असे आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी पारित केले आहेत.