फलटण | धैर्य टाईम्स | १८ एप्रिल २०२५
गेले ६० वर्षे पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील कार्य, पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक उभारणारे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, मसाप, पुणेचे जिल्हा प्रतिनिधी, साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांच्या कार्याचा गौरव समारंभसाता-यात शनिवार दि.१९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मावळा फौंडेशन आणि जिल्हयातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे हा गौरव समारंभ होणार असल्याची माहिती सोहळ्याचे निमंत्रक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे आणि रवींद्र बेडकिहाळ गौरव समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली.
जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणा-या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते श्री. बेडकिहाळ यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
१९६८ पासून गेली ५७ वर्षे श्री. बेडकिहाळ हे विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारांवरील आपद्ग्रप्रसंगात त्यांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी त्वरित अर्थसाह्याचा हात देण्यासाठी त्यांनी दि.६ जानेवारी १९८७ रोजी सातारा येथूनच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या स्वायत्त विश्वस्त संस्थेची स्थापना केली. राज्यात तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात सुध्दा त्यांच्या निधनानंतर १४७ वर्षांमध्ये कोणीही स्मारक उभारले नव्हते. परंतु या दुर्गम भागामध्ये त्यांनी सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून १९९३ मध्ये बाळशास्त्रींच्या जन्म गावी पोंभुर्ले ता. देवगड जि. सिंधुदुर्ग येथे राज्यातील पहिले स्मारक म्हणून 'दर्पण' सभागृह उभारले. गेली ३५ वर्षे तिथे विविध कार्यक्रमातून व राज्यातील गुणवंत पत्रकारांना 'दर्पण पुरस्कार' देऊन आजही बाळशास्त्रींची स्मृती जिवंत ठेवली आहे.
२०१०मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ अशा संस्थेवर संघर्षातूनच ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून गेले तेव्हा पासून सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ७ नवीन शाखा स्थापन केल्या. आजही वयाच्या ८१ वर्षी पत्रकारिता, साहित्य, शैक्षणिक कार्यात ते उत्साहाने मार्गदर्शन करत आहेत. या सर्व कार्याबद्दल श्री. बेडकिहाळ यांचा गौरव करण्यात येणार असून या समारंभास जिल्हयातील सर्व पत्रकार, साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन गौरव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.