कराड शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे तास-दिडतास मुसळधार वादळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाची सुरुवात झाली. रात्री आठ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता.
कराड : कराड शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे तास-दिडतास मुसळधार वादळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाची सुरुवात झाली. रात्री आठ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता.
कराड शहर परिसरात आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाची सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील व्यापारी, नागरिक, प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. तसेच शहरातील वाहतूकीवरही पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून आले. तर शहरातील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने केरळ व उर्वरित कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार मंगळवारी 30 नोव्हेंबर रोजी पहाटेपासून ढगाळ वातावरण होते. हीच परिस्थिती बुधवारी 1 रोजी दुपारपर्यंत कायम होती. परंतु, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कराड शहर व तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांशी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, वारंवार पडणाऱ्या वादळी व अवकाळी पावसामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या ऊस तोडणी सुरू असून अवेळी आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी ऊसतोड ठप्प झाली आहे. त्याचबरोबर पंधरा-वीस दिवसांमध्ये दुसऱ्यांदा सलग दोन-चार दिवस झालेल्या पावसामुळे शेतात ओलावा निर्माण झाला असून बऱ्याच ठिकाणी सुमारे 15 ते 20 दिवस ऊस तोडणी सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शिवाय, शाळू व हरभरा या रब्बी पिकांसाठीही जास्तीचा पाऊस मारक ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.