गत काही महिन्यांपासून सुपने, पश्चिम सुपने, केसे, पाडळी, तसेच तांबवे विभागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तसेच बिबट्याने हल्ले करून अनेक पाळीव प्राणी मारले असून माणसांवरही बिबट्याने जीवघेणे हल्ले केले आहेत.
कराड : गत काही महिन्यांपासून सुपने, पश्चिम सुपने, केसे, पाडळी, तसेच तांबवे विभागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तसेच बिबट्याने हल्ले करून अनेक पाळीव प्राणी मारले असून माणसांवरही बिबट्याने जीवघेणे हल्ले केले आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातानारण निर्माण झाले असून वीज महामंडळाने सुपने विभागातील शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी विभागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सुपने विभागातील शेतकऱ्यांनी गुरुवार दि. २५ रोजी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, तसेच महावितरणच्या मुंढे, सब स्टेशन कार्यकारी अभियंता यांना मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी शिवाजी पाटील, बाबासो पाटील, शशिकांत कोळी, भागवत बडेकर, तुकाराम मोरे, राम गायकवाड, भिकाजी गायकवाड, दत्तात्रय थोरात, विश्वजित थोरात, भगवान गायकवाड, बाळासाहेब कोळी, दीपक गायकवाड, हणमंत जाधव, तुकाराम जांभळे तसेच शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सुपने, पश्चिम सुपने, केसे, पाडळी, तांबवे विभागात बिबट्याचे वारंवार हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिबट्याने आत्तापर्यत सुपाने व तांबवे विभागात अनेक पाळीव प्राणी प्राण्यांवर हल्ले करून त्यांचा प्राण घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी येणके येथे बिबट्याने ऊसतोड मजुरांच्या ५ वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार मारले होते. त्यामुळे कराड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आता भर दिवसाही शेतात जायला धजावत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यातच महावितरणकडून शेतकऱ्यांना शेती पंपासाठी रात्री १२:३० ते सकाळी ८:३० असा वीजपुरवठा केला जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. बिबट्याच्या भीतीने शेतकरी रात्री शेतात जात नाहीत. तसेच शेतातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील लोकांना तर दिवसाही घराबाहेर पडणे संकटकारक बनले आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम सुपने येथे दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. या सर्व घटनांमुळे विभागातील शेतकऱ्यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या सगळ्याचा महावितरण, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य दाखल घेऊन शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.