फलटण : आगामी लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला असून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. माढा लोकसभा मतदार संघात महायुती कडून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर झाली आहे मात्र रणजितसिंह यांची उमेदवारी आपल्याला मान्य नसून महायुतीने रणजितसिंह यांची उमेदवारी बदलावी असे आवाहन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते आमदार रामराजेंनी महायुतीला घरचा आहेर दिला. ते आज फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जाहिर मेळाव्यात बोलत होते.
यावेळी आमदार दिपकराव चव्हाण आमदार, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर चेअरमन, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, संदीप मांढरे, सुनील पोळ, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, महानंदाचे संचालक डी. के. पवार, माजी जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, अजून वेळ गेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी गडबड करू नये माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार भाजपाने बदलावा यावर आजही आपली भूमिका ठाम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण युती धर्म पाळणार असलो तरीही हाच उमेदवार ठेवायचा असेल तर मतदान कमी झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण सांगणार असल्याचे रामराजे म्हणाले. माझे राजकारण हे केवळ पाण्यासाठी होते मात्र आता नको त्या माणसांच्या हातात हा जिल्हा जाऊ नये अशी अपेक्षा यावेळी रामराजे यांनी बोलून दाखवली.
अनेक गट तट असताना आपण कधी सत्तेचा माज केला नाही ना कधी कोणाला पोलीसचौकी दाखविली मात्र याच्या उलट खासदार रणजीतसिंह यांचे काम सुरु असल्याचे सांगून प्रशासन मात्र यांच्या दारातले नोकर असल्यासारखे यांचेच ऐकत असल्याने हे कुठेतरी थांबले पाहिजे तरच आपल्याला भविष्य असल्याचे रामराजे म्हणाले. तालुक्यात दडपशाही व दहशतीचे काम खासदार रणजितसिंह यांच्याकडून सुरू असून हे त्यांनी ही वागणूक बदलाचा शब्द व सुडाचे राजकारण नकरता कार्यकर्त्यांना लोकशाही प्रमाणे मनमोकळे पणाने काम करायला संधी देऊ असे जाहीरपणे सांगावे अशी अपेक्षा रामराजे यांनी यावेळी केली.
रणजितसिंह यांना उमेदवारी घोषित होऊन अनेक दिवस झाले तरीही आतापर्यंत आपल्याला फोन आला नसून यांना आमची गरज आहे का नाही हा प्रश्न यावेळी रामराजे यांनी उपस्थित केला. संपूर्ण जिल्हा यांचाच असल्यासारखे बोलणारे बोराटवाडीच्या आमदारांनाच मुख्यमंत्री करू असे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता रामराजे यांनी टोला लगावला. तर महायुतीचा माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलावा यावर आपण ठाम असलो तरीही उमेदवारांनी आपण चूकलो असल्याचे कबूल करावे व आम्हाला विश्वास द्यावा अशी अपेक्षा रामराजे यांनी केली. मी पाण्यासाठी व तुमच्यासाठी स्वतःचा संसार न पाहता गेले 30 वर्षे झिझलो असल्याचे शेवटी रामराजे यांनी म्हटले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या मेळाव्यात अनेकांनी तीव्र शब्दात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह यांच्या उमेदवारीला विरोध केला याचा धागा पकडून रामराजे म्हणाले कार्यकर्त्यांच्या मध्यमातून उफाळून आलेला हा मतप्रवाह आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असली तरीही माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून संघर्ष थांबायचे नाव घेत नसल्याचे आजच्या मेळाव्या मधून दिसत आहे.
फलटण येथील रामराजे यांनी घेतलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिर मेळाव्यात शरद पवारांच्या तुतारीची मागणी. केल्याने नेते घड्याळात व्यस्त तर कार्यकर्त्यांचा सुर तुतारीचा असा प्रकार निदर्शनास आला.