फलटण प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती फलटण यांच्या वतीने आयोजित “कृतज्ञता मेळावा व विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा” या भव्य कार्यक्रमात ग्रामपंचायत सुरवडी (ता. फलटण) हिला “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान सुरवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शरयू जितेंद्र साळुंखे-पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि मान्यवर म्हणून ना. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, जयकुमारजी गोरे मंत्री, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, शंभूराज देसाई मंत्री, राज्य उत्पादन शुल्क व पालकमंत्री, सातारा जिल्हा, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रणजितसिंह नाईक-निंबाळकर माज़ी खासदार, माढा लोकसभा मतदारसंघ, संतोष पाटील-जिल्हाधिकारी, सातारा. प्रल्हादराव साळुंखे पाटील ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पार्टी, फलटण, तसेच फलटण तालुक्यातील अनेक मान्यवर नेते मंडळी, सरपंच आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरवडी ग्रामपंचायतीने ग्रामविकास, स्वच्छता, जलसंवर्धन, हरितग्राम, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल ग्रामपंचायत या क्षेत्रांत उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. या कामगिरीमुळे सुरवडी गावाने तालुक्यात व जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.
या सन्मानानंतर सौ. शरयू साळुंखे-पाटील म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्या ग्रामस्थांचा, ग्रामपंचायत सदस्यांचा आणि प्रशासनाच्या सहकार्याचा सन्मान आहे. ग्रामविकासाच्या दिशेने सुरवडी गाव आणखी वेगाने वाटचाल करेल, हेच आमचे ध्येय आहे.”











