सातारा दि 27 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन हा प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती शाहू बोर्डिंग सातारा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मार्गावर समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. समता दिंडीचे सुरुवातीस स्वाती इथापे, उपायुक्त, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा अनिल गुजर, पोलीस उपअधीक्षक, दक्षता पथक, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा, शाली जोसेफ, प्राचार्या, समाजकार्य महाविद्यालय, सातारा नितीन उबाळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा व उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन होऊन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर यांनी समता दिंडीस हिरवा ध्वज दाखवून मार्गस्थ केले. या प्रसंगी समता दिंडीमध्ये वरीष्ठ अधिकारी कर्मचारी, शहरातील विविध शाळांमधील सुमारे 200 विद्यार्थी व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व नागरीक सहभागी झाले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा व सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यामाने स्थुलता जनजागृती आणि उपचार अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे सुरुवातीस सामुहिकरित्या व्यसन मुक्तीची शपथ घेण्यात आली. त्यांनतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच आश्रमशाळेतील शिक्षक व बाहयस्रोत कर्मचारी असे एकूण 78 व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी शिबीरासाठी डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा. डॉ. प्रितीश राऊत व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. तसेच सदर दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते विविध 35 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन चरीत्र व सामाजिक कार्य या विषयावर प्राध्यापक निरंजन फरांदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री. उबाळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी केले. व्याख्याते यांनी व्याख्यानाच्या विषयाच्या अनुषंगाने बोलताना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठी केलेले कार्य हे सर्वसमावेशक असून या कार्याव्दारे त्यांनी सामाजिक न्याय आणि मानवतेची प्रतिष्ठापना केली असल्याने त्यांचे हे कार्य अनन्यसाधारण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. या व्याख्यानाकरिता प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ए. सी. अत्तार, प्राचार्य, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा यांची उपस्थिती लाभली. तसेच या व्याख्यानाकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



















