आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठूरायाच्या पंढरीत स्वच्छता राखण्यासाठी व लक्षावधी भाविकांना कोणत्याही रोगराईला सामोरे जावे लागू नये, यासाठी भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) ६०० स्वच्छतादूत सज्ज झाले असून, बुधवारपासून पंढरीत स्वच्छता राखण्याचे काम करण्यात येत आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक, वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. या वेळी पंढरीत स्वच्छता राखली जावी, भाविकांना कोणत्याही अस्वच्छतेचा सामना करावा लागू नये, यासाठी ‘बीव्हीजी’ने पुढाकार घ्यावा, अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी ‘बीव्हीजी’चे चेअरमन मा. हणमंतराव गायकवाड यांना केली होती. गायकवाड यांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या आठ तासांत ६०० स्वच्छतादूत अत्याधुनिक साहित्यासह पंढरपूरला रवाना केले आहेत. या स्वच्छतादूतांमार्फत ‘बीव्हीजी’ची विठूरायाचरणी स्वच्छतासेवा अर्पण करण्यात येत आहे.
‘वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेली पंढरी स्वच्छ करण्याची संधी आमच्या ‘बीव्हीजी’ला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या सूचनेनुसार अवघ्या आठ तासांत आमचे ६०० स्वच्छतादूत अत्याधुनिक साहित्यासह पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांना स्वच्छ व निरोगी वारी अनुभवता यावी, यासाठी हे स्वच्छतादूत अहोरात्र कार्यरत आहेत. सदर सेवेचा कोणताही मोबदला न घेता ‘बीव्हीजी’तर्फे ही सेवा देण्यात येत आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘बीव्हीजी’चे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली.
तर, ‘स्वच्छता क्षेत्रात काम करणारी ‘बीव्हीजी’ ही देशातील प्रथम क्रमांकाची संस्था आहे. पंढरपूर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘बीव्हीजी’ने पुढाकार घेतल्याने सरकारी यंत्रणेवरचा आणि मनुष्यबळावरील ताण निश्चितच कमी होणार आहे,’ असा विश्वास सोलापूरचे जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांनी व्यक्त केला आहे.



















