फलटण प्रतिनिधी : महाराष्ट्र हि साधू, संत, महात्मे, व महापुरुषांची भूमी असून या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी काम केले. तरीही आपण या महापुरुषांना जाती धर्माच्या चौकटीत अडकवीत असल्याची खंत व्यक्त करीत यापुढे महापुरुषांचे जयंती महोत्सव सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येवुन गाव व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साजरे करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे मत ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केले.
शिंदेवाडी ता.फलटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरद प्रतिभा शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिंदे, सरपंच सौ.निर्मला शिंदे, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, प्रा.रमेश आढाव, माजी प्राचार्य रविंद्र येवले, साहित्यिक तानाजी जगताप, संजय अहिवळे, उपसरपंच अनिल शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात लाखो भाविक एकत्र येतात त्यावेळी कुणीही जात धर्म विचारत नाहीत मात्र अलीकडे महापुरुषांचे जयंती उत्सव जाती निहाय साजरे होताना दिसत असून हे चित्र सामाजिक दृष्ट्या धक्कादायक आहे. सामाजिक समता निर्माण होण्यासाठी या महापुरुषांचे जयंती उत्सव समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवुन साजरे केले पाहिजेत अशी अपेक्षा सुभाषराव शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक समाज घटकासाठी काम केले. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण समाजव्यवस्थेत काम करीत असून डॉ.आंबेडकर यांची जयंती गावाच्यावतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला. देशातील प्रत्येक समाजघटकांसाठी काम करणाऱ्या महापुरूषांच्या प्रती आपल्या भावना भारतीयत्वाचा असल्या पाहिजेत असे सुभाषराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.
शिंदेवाडी पॅटर्न तालुक्यातील परिवर्तन व प्रबोधनाची दिशा ठरेल : रविंद्र बेडकिहाळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाचे नेते होते. त्यांनी भारताला संविधान देवून प्रगतीची नवी दिशा दिली. त्यामुळे अशा आदर्श व्यक्तिमत्वाची जयंती सर्व समाजानेच साजरी केली पाहिजे. ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी शिंदेवाडी येथे सर्व ग्रामस्थांना एकत्र करून डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी केली, हा शिंदेवाडी पॅटर्न तालुक्यातील परिवर्तन व प्रबोधनाची दिशा ठरेल अशी अपेक्षा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त देशाला राज्यघटनाच दिली असे नव्हे तर सामान्य वंचित घटकांना न्याय व स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास व अन्याय विरुद्ध लढण्याचे बळ दिले. शालेय विद्यार्थी व तरुण पिढीसमोर पुन्हा नव्याने डॉ.बाबासाहेबांचे विचार देण्याची आवश्यकता असल्याचे माजी प्राचार्य रविंद्र येवले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तानाजी जगताप, प्रा.रमेश आढाव आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटातील विविध पैलूंवर विचार व्यक्त केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शरद प्रतिभा शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. युवा उद्योजक महेश शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामसेवक, शिंदेवाडी, खुंटे, कांबळेश्वर, पाटणेवाडी, वडजल या गावातील ग्रामस्थ, शरद प्रतिभा हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.