फलटण प्रतिनिधी:- शहरातील नाना पाटील चौक येथील भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिक यांनी महावितरणच्या कारभाराला कंटाळून एकत्र येत सामूहिकपणे वीज कनेक्शन बंद करत दुकाने बंद करत असल्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व ऊर्जामंत्री तथा उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील दहा ते पंधरा दिवसापासून स्टेट बँक परिसर, शिव कॉम्प्लेक्स, बसस्टँड समोरची बाजू, नाना पाटील चौक या भागातील वीज पुरवठा संपूर्ण दिवस खंडित राहत आहे. सदरचा भाग हा मुख्य बाजारपेठेत असल्याने या भागात विजेची सतत गरज असते असे असताना महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिक अडचणीत आले असून ऐन उन्हाळ्यामध्ये व्यवसायिकांना व्यवसाय करताना अनेक त्रासांना समोर जावे लागत आहे. महावितरणच्या सततच्या वीज खंडित पुरवठ्यामुळे अनेक व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून अनेक व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
फलटण शहर महावितरणचे शाखा अभियंता व जनमित्र हे संबंधित भागात फिरकत नसल्याने तासनतास वीज पुरवठा तसाच खंडित राहत आहे सध्या एकीकडे बाजारपेठेमध्ये मंदीची सावट असल्याने व्यवसायिक अगोदरच त्रासलेले असून सततच्या वीज खंडित पुरवठ्यामुळे व्यवसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा महावितरण शाखा अभियंता व जनमित्र यांच्याकडे तोंडी तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारची दखल व दक्षता न घेतल्याने त्रासलेल्या व्यवसायिकांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या नावे निवेदन दिले असून यामध्ये वीज खंडित पुरवठ्यामुळे हैरान झाल्याने कंटाळून एकत्रित येत सामूहिकपणे वीज कनेक्शन बंद करून व्यवसाय बंद करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मागील अनेक महिन्यापासून शहरातील मूळ बाजारपेठेतील वीज समस्यांमध्ये वाढ झाली असून कोणताही महावितरण अधिकारी व जनमित्र याकडे लक्ष देत नसल्याने फलटणमधील व्यावसायिक ग्राहक त्रास असल्याचे निवेदनात म्हंटले आहे आता एकत्रित व्यवसायिकांनी महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बदल न झाल्यास सामूहिकपणे व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वीज ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वीज खंडित करू नये अशी महावितरण वरिष्ठ कार्यालयाचे आदेश असताना कोणतीही कल्पना न देता मागील पंधरा दिवसापासून सतत वीज खंडित होत आहे व सदस्या वीज खंडित पुरवठ्याकडे महावितरण शाखा अभियंता व जनित्र लक्ष देत नसल्याने रात्रीच्या वेळी ही वीजपुरवठा खंडित राहत आहे. व्यवसायिक वीज ग्राहकांना जलद व अखंडितपणे वीज सेवा देण्याचे महावितरणचे आदेश असताना फलटण शहरात वीज सेवा दिली जात नाही. फलटण शहरातील व्यवसायिकांनी वीज सेवा मिळत नसल्याने व्यवसायिकांनी दिलेल्या निवेदनामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व
ऊर्जामंत्री तथा उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महावितरणचे अधिकारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महावितरण शाखा अभियंता अनिरुद्ध निमकर यांना व्यापारी निवेदन देण्यास गेले असता "हे निवेदन वरिष्ठांना पण नक्की द्या" असा खोचक सल्ला व्यापाऱ्यांना दिला यावरून महावितरण शाखा अभियंता अनिरुद्ध निमकर किती मुजोरपणे काम करत आहेत याचा प्रत्यय येतो.