कडप्पा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तर अनंतपुरमध्ये ७ आणि चित्तूर जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला. सध्या काही भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार घातला आहे. मुसळधार पावसामुळे काही भागातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. ज्यामुळे स्थानिक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे २४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत.
कडप्पा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तर अनंतपुरमध्ये ७ आणि चित्तूर जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला. सध्या काही भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
रायलसीमाच्या तीन जिल्ह्यांमधील नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले असून यामुळे संपर्क करणे कठीण झाले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्यामुळे वाहने वाहून गेली आहेत. अनेक घरांचे नुकसान झाले आहे, तर ३.४ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली असून शेकडो गुरे वाहून गेली आहेत. या जिल्ह्यामध्ये जवळपास ८,२०६.५७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
कडप्पा जिल्ह्यातील चेयेरू नदीला अचानक पूर आल्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण बेपत्ता झाले आहेत. एनडीआरफ, पोलीस आणि अग्निशमन सेवेतील कर्मचाऱ्यांनी कडप्पा आणि चित्तूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील दहा स्थानिक लोकांची सुटका केली आहे. दरम्यान पूरामुळे संपर्क तुटलेल्या सहा गावांशी एनडीआरएफने संपर्क पूर्ववत केला आहे. उर्वरित शेवटच्या गावासोबत संपर्क करण्यासाठी एनडीआरएफचे प्रयत्न सुरू आहेत. IAF टीमने Mi-17 हेलिकॉप्टर वापरून JCB मध्ये अडकलेल्या दहा लोकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन केले.