उघड्यावरचे दुषित खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने.तसेच दुषित हात न धुता खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने टायफॉईड/विषमज्वर, कावीळ, अतिसार/हगवण यांसारखे आजार पसरतात. टायफॉईडमध्ये ताप, डोकेदुखी, पोटदुखी, मळमळणे, उलटी होणे, थकवा येणे ही लक्षणे दिसून येतात.
पावसाळा हा ऋतु प्रत्येकाला हवाहवासा वाटतो पण पावसाळा आला की आजारपणही आलंच. पावसात जमिनीवर साचणाऱ्या दुषित पाण्यामुळे अनेक आजार पसरतात. पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य आजारांसह ताप, सर्दी व खोकल्याचे रूग्ण वाढतात. हे आजार टाळायचे असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी पौष्टिक आहाराच्या सेवनासह आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
पावसाळ्यात होणारे विविध आजार व त्याची लक्षणे खालीलप्रमाणे
फ्लू, सर्व सामान्य सर्दी, एच.वन. एन. वन., कोरोना, अशा विविध विषाणूमुळे श्वसनाचे आजार होतात. याची सर्वसामान्य लक्षणे ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अंगदुखी, थकवा येणे, धाप लागणे आहेत. या आजारांचे संक्रमण बोलताना, शिंकताना अथवा खोकताना थुंकीवाटे उडणाऱ्या तुषारांतून, दुषित पृष्ठभाग (दरवाजा, टेबल, रेलिंग अथवा अशा गोष्टींना स्पर्श केल्यानंतर तोच हात न धुता चेहरा, डोळे, नाक, तोंड यांना लावल्यानंतर), गर्दीच्या ठिकाणी वावरणे यातून होते.
उघड्यावरचे दुषित खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने.तसेच दुषित हात न धुता खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने टायफॉईड/विषमज्वर, कावीळ, अतिसार/हगवण यांसारखे आजार पसरतात. टायफॉईडमध्ये ताप, डोकेदुखी, पोटदुखी, मळमळणे , उलटी होणे, थकवा येणे ही लक्षणे दिसून येतात. तर कावीळ झाल्यास ताप, डोळे व अंग पिवळे पडणे, गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे पोटदुखी, मळमळणे , उलटीहोणे, थकवा अशी लक्षणे आढळतात. अतिसार किंवा हगवण लागल्यास जुलाब होणे, पोटदुखी, मळमळणे , उलटी होणे, थकवा येणे, जुलाबातून रक्त पडणे इ. लक्षणे आढळतात.
पावसाळ्यामध्ये अडगळीची ठिकाणे डबकी, टायर अशा ठिकाणी पाणी साचून त्यामध्ये डासांची उत्त्पती वाढते. एडीस इजिप्ती या डास चावल्यास डेंगू, चिकनगुन्या हे आजार होण्याचा धोका वाढतो. हा डास स्वच्छ साठवलेल्या पाण्यात अंधाऱ्या जागी वाढतो तसेच दिवसा चावतो. डेंगू मध्ये अचानक थंडी वाजून ताप येणे हाडे व सांधे दुखणे, डोळ्यांच्या खोबणीत दुखणे, गंभीर स्वरूपाच्याडेंगू मध्ये रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे लालसर पुरळ येणे, नाक/त्वचा/हिरड्या/गुदद्वार अशा जागांमधून रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसून येतात.
चिकनगुन्या झाल्यास थंडी वाजून ताप येणे, सांधे दुखणे खासकरून हात व पायांच्या बोटांचे सांधे, थकवा अशी लक्षणे दिसून येतात. अॅनाफिलीस डासामार्फत मलेरिया हा आजार पसरतो. हा डास साचलेल्या डबक्या मध्ये वाढतो. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, मळमळणे, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवतात. पुराच्या पाण्यामध्ये उंदीर घुशी अशा प्राण्यांची लघवी मिसळलेली असते. अशा पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे पायाच्या भेगामधून, तोंड, डोळे व नाक इत्यादी वाटे लेप्टोस्पायरोसिस आजार होतो. थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, मळमळणे, चक्कर येणे, डोळे पिवळसर व लालसर होणे रक्तस्त्राव होणे लक्षणे जाणवतात.
आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. बरे वाटले तरी दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करावा. पुरेशी विश्रांती घेतल्यास शरीरास आजाराशी प्रतिकार करण्यास अवधी मिळतो. पाणी/नारळ-पाणी/सूप/ओ.आर.एस. चे पाणी अशा द्रव पदार्थांचे सेवन करावे. तीव्र वेदना, वारंवार उलट्या होणे, चक्कर येणे, धाप लागणे, झटके येणे, रक्तस्त्राव अशी गंभीर लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल व्हावे.
संकलन जिल्हा माहिती कार्यालय,
सातारा