सातारा दि. १, : प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. परंतु आपली सुद्धा एक जबाबदार असते. प्रत्येकाने आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसे आपला गाव आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वच्छता पंधरवड्याची संकलपना यशस्वी करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडूया असे आव्हान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
नाडे नवा रस्ता ता.पाटण येथे शासनाच्या वतीने व नाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्वच्छता अभियान कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाटणचे प्रांत अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड, गटविकास अधिकारी गोरख शेलार, पाटण शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळकृष्ण पाटील, उपसभापती विलास गोडांबे, नाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता नलवडे, उपसरपंच राजेंद्र पवार, विजय पवार, डॉ.विजय देसाई, बबनराव भिसे, विष्णू पवार,यांच्यासह परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कर्मचारी अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता पंधरवड्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर ठेवली. त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात या स्वच्छता पंधरवड्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून सातारा जिल्ह्यात त्याचा दिमाखात शुभारंभ झाला आहे.
आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ती जबाबदारी पार पाडत असते मात्र आपली सुद्धा स्वतःची महत्वपूर्ण जबाबदारी असते. जसे आपण घर स्वच्छ ठेवतो. तसे घरातील कचऱ्याची जशी विल्हेवाट लावतो त्या पद्धतीने परिसर कचऱ्याची सुद्धा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे. निरुपयोगी कचरा आपण रस्त्यावर टाकत असतो. याबाबत सर्वांनी
काळजी घेणे आवश्यक आहे. येत्या पंधरा दिवसात प्रशासनाच्या वतीने गावागावात जाऊन स्वच्छतेचे प्रबोधन केले जाणार आहे. या पंधरा दिवसात सर्व नागरिकांनी उस्फुर्तपणे या अभियानात सहभागी व्हावं असे आव्हान ही पालकमंत्री श्री देसाई यांनी केले.
पालकमंत्री श्री देसाई पुढे म्हणाले, परिसराच्या स्वच्छतेमुळे रोगराईला आळा बसतो. त्यामुळे स्वच्छता पंधरवड्याची जबाबदारी आपण सर्वांन पार पाडूया.