सुप्रीम कोर्ट काय उद्या निकाल देणार याकडे फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. पण यादरम्यान आणखी एक प्रश्न उपस्थित आहे तो म्हणजे, जर सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी असणाऱ्या 24 आमदारांचं काय होणार?
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मात्र शिंदेंसोबत गेलेल्या उर्वरित २४ आमदारांचं काय होणार? याचीही उत्सुकता सगळ्यांना आहे. याबाबत कायदेतज्ज्ञांची भिन्न मतं आहेत.
सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. उर्वरित आमदारांबाबत कोर्टात काहीच सुनावणी झालेली नाही. त्यामुळं केवळ 16 आमदारच अपात्र ठरतील, असं काही कायदेतज्ज्ञांचं मत आहे. तर ज्या न्यायानं आधीच्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल, तोच न्याय इतर 24 जणांनाही लागू होईल. त्यामुळं आधीचे आणि नंतरचे असे शिंदेंसोबतचे सगळेच आमदार अपात्र ठरतील, असंही काही कायदेतज्ज्ञांना वाटतं. तिसरीकडं अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाण्याचीही शक्यता आहे.
हे आहेत 16 आमदार
1) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) तानाजी सावंत
4) यामिनी जाधव
5) संदिपान भुमरे
6) भरत गोगावले
7) संजय शिरसाट
8) लता सोनावणे
9) प्रकाश सुर्वे
10) बालाजी किणीकर
11) बालाजी कल्याणकर
12) अनिल बाबर
13) संजय रायमूलकर
14) रमेश बोरनारे
15) चिमणराव पाटील
16) महेश शिंदे
सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. घटनापीठाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती एम आर शहा १५ मे रोजी निवृत्त होत असल्याने घटनापीठ त्याआधी निकाल देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुप्रीम कोर्ट आता नेमकं काय निकाल देतं, यावर पुढचं सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे. निकाल विरोधात गेला तरी सरकार टिकवण्याच्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आला आहे.



















