आमदार रामराजे नाईक निंबाळकर व एका माजी आमदाराच्या मुलाने व्यावसायिक अडचणीत आणत माझा मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता असताना आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्यामुळेच आपण सही सलामत बचावलो - सागर अभंग
विडणी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये यश संपादन केल्यानंतर केवळ दोन महिन्याच्या कालावधी मध्येच तब्बल 23 कामांचे भूमिपूजन आज होत आहे. काही दिवसातच गावातील रस्त्यांची कामेही सुरू होतील. विडणी गावातील काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी लावलेले आपापसातील वाद आपण सामाजिक एकोप्यातून मिटवून संपूर्ण गाव सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून गुण्या गोविंदाने एकत्र करू असा विश्वास व्यक्त करतानाच तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास व तुम्ही दिलेल्या मतांची किंमत विडणी गावच्या विकासातून दाखवून देईन असा विश्वास विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी व्यक्त केला. ते विडणी (फलटण )येथे झालेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क दौऱ्याच्या आभार सभेत बोलत होते.
यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नरसिंह निकम, माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, विठ्ठल नाळे, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, उपाध्यक्ष तुकाराम ढमाळ, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, जाकीर मणेर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, निंभोरेच्या सरपंच कांचन रणवरे, बाळासाहेब ननावरे, तुकाराम शिंदे, अमित रणवरे, सचिन ननावरे, भाजपा महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत, विडणी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सरपंच सागर अभंग म्हणाले की, विडणी गावातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून सत्ता परिवर्तन करत माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. निवडणूक प्रचारा दरम्यान अतिशय खडतर प्रवासातून विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांचे दोन्ही बंधू व त्यांची मुले सुद्धा विडणी येथे प्रचार सभेसाठी येत होती मात्र मतदारांनी माझ्यावर विश्वास देत मोठ्या राजकीय शक्तीला आसमान दाखवण्याचं काम केल्याचं अभंग यांनी निदर्शनास आणून दिले.
विडणी मधील विविध 53 कामे मंजूर असून त्यापैकी आज 23 कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. 32 कोटी 80 लाख रुपयाच्या पेयजल योजनेच्या माध्यमातून विडणीला प्रति माणसे 55 लिटर पाणीपुरवठा येणाऱ्या काळात करण्यात येणार आहे. तर या योजनेचा बॅलन्सिंग टॅंक एक कोटी 30 लाख लिटर असल्याने भविष्यातील विडणीचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटल्याचे सरपंच सागर अभंग यांनी निदर्शनास आणून देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले.
विडणी करिता बरड ऐवजी कोळकी फिडरवरून वीज प्रवाह मिळावा, गावठाण विस्तार व्हावा, सुसज्ज व्यायाम शाळा, विडणी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मिती व्हावी या मागण्या यावेळी सरपंच सागर अभंग यांनी खासदार रणजितसिंह यांनी पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार रामराजे नाईक निंबाळकर व एका माजी आमदाराच्या मुलाने व्यावसायिक अडचणीत आणत माझा मोठा घातपात करण्याची शक्यता असताना आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्यामुळेच आपण सही सलामत बचावलो असल्याचे अभंग यांनी सांगितले.
केवळ रस्ते, पाणी, वीज हे प्रश्न सोडवून चालणार नाही तर गावातील प्रत्येक माणसाचा विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे शेवटी सागर अभंग यांनी सांगितले.