फलटण :
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात चांगलाच तापवला आहे. आता तर आमदारही या वादातून सुटू शकले नाही. सोमवारी सकाळपासूनच आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी आग लावली.
आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनास सातारा जिल्ह्यातून पाठिंबा वाढला आहे. आरक्षणाचा मुद्दा पेटू लागल्याने मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सातारा बंदची हाक दिली आहे. नागरिक, व्यावसायिकांनी बंदच्या हाकेला प्रतिसाद देण्याचे आवाहन समन्वयकांनी केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु राहणार आहे.
आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवा यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला. जिल्हयात मराठा समाजाच्यावतीने गावोगावी कुठे बाईक रॅली, पदयात्रा, कँडल मार्च काढण्यात येत आहे. जिल्ह्यातील सातारा, फलटण, पाटण, दहिवडी, वाई, कराड, कोरेगाव, शिरवळ, मायणी आदी ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साखळी उपोषण सुरु आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वच समाज घटकांतून उत्स्फुर्त पाठिंबा मिळूत आहे.
सोमवारी सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनी जाहीर समर्थन केले. मंगळवार दि. ३१ रोजी सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. नागरिकांनी स्वस्फूर्तीने बंदमध्ये सामील व्हावे आणि बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन करण्यात आले आहे.