फलटण प्रतिनिधी -
वंचित बहुजन आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सध्यातरी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अखेर उमेदवार ठरल्याने वंचित विरोधात महायुती अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपल्या उमेदवारी विषयी बोलताना रमेश बारस्कर म्हणाले, माढा मतदारसंघात 2 विधानसभा एससी समुहाच्या आहेत. माळशीरस आणि फलटण तालुक्यात जवळपास 18 टक्के लोकसंख्या एससी समाजाची आहे. त्यामुळे जवळपास साडेतीन लाख मतदारस एससी समाजातून येतो. माळी समाजाचा अडीच लाख मतदार आहे. मायक्रो ओबीसी अडीच लाख आहे. मुस्लीम समाज दीड लाख आहे. धनगर समाजाचे मतदान जवळपास साडेचार लाख आहे. ओपनचं मतदान पाच लाखांच्या पुढे आहे. ओबीसी बहुल हा मतदारसंघ आहे. सध्या ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलंय. त्यामळे समाज जागा झालाय. माढात ओबीसींची परिषद घेऊन आम्ही आरक्षणाबाबत भूमिका घेतली आहे. आमच्या भूमिकेला सर्व समाज पाठिंबा देतील, अशी अपेक्षाही वंचितचे माढा लोकसभेचे उमेदवार रमेश बारस्कर यांनी केली आहे.
पुढे बोलताना रमेश बारस्कर म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात जिंकण्यासाठी वंचित ही निवडणूक लढवणार आहे. मनोज जरंगे यांच्या आंदोलनामुळे समाजात उभी फूट पडली असून आरक्षणवादी सर्व समाज एका बाजूला विभागाला गेला आहे. मनोज जरंगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसींची ताकद या निवडणुकीत दिसून येणार असून लहान लहान गावापर्यंत ओबीसी समाजाच्या मतदारांत मोठी जागृती झाल्याचा दावा बारसकर यांनी केला आहे. आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडताना आरक्षणात मराठ्यांचे ताट वेगळे व ओबीसी ताट वेगळे ठेवण्याची भूमिका घेतली होती.
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता. मात्र ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास सगळ्या ओबीसी समाजाचा विरोध होता. राज्यात वेगळे काही समीकरण बनते आहे का? हे पाहण्यासाठी जरांगे यांनी आंबेडकर यांची भेट घेतली असली तरी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे ओबीसी मतांची ताकद निकालानंतर दिसून येणार असून राज्यातील वंचितांचा पहिला गुलाल माढा मधून दिसेल, असे बारसकर यांनी सांगितले
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला. ओबीसी समाजाच्या वतीने मी प्रकाश आंबेडकर आभार व्यक्त करतो. माढा मतदारसंघातील मुद्दे घेऊन मी निवडणूक लढेल. तर मोहिते पाटील यांची भूमिका अजून तळ्यात मळ्यात असल्याने लोकात संभ्रम आहे. आपल्या उमेदवारीमुळे भाजपकडे गेलेला ओबीसी समाज वंचितांच्या मागे येईल. राष्ट्रवादीकडे गेलेला अनुसूचित जातींचा मतदार पुन्हा प्रकाश आंबेडकर यांच्या मागे आलेला दिसेल, असा दावा केला आहे . त्यामुळे वंचितांच्या उमेदवारीचा फटका भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांना बसून विजय वंचितांचा होईल, असंही बारस्कर यांनी म्हटलं.