निरा - देवघर व धोम-बलवडीच्या पाण्याच्या श्रेय वादावरून फलटण तालुक्यातील नेत्यांनी बोरीचा बार भरवलेला आहे.तो बोरीचा बार आता बंद करावा या प्रश्नांशिवाय सुध्दा इतर अनेक विविध कामे प्रलंबीत आहेत त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष्य देणे गरजेचे असल्याचा सल्ला फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी दिला.
ते फलटण येथील वेणूताई चव्हाण हायस्कूल येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), तालुका कॉंग्रेस कार्याध्यक्ष अमीर शेख उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे अशोकराव शिंदे
सातारा जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, फलटण शहर अध्यक्ष पंकज पवार, शहर उपाध्यक्ष मनोहर गायकवाड, खजिनदार बालमुकुंद भटटड, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री गंगाराम रणदिवे, युवक अध्यक्ष अजिंक्य कदम, शहर युवक अध्यक्ष प्रितम जगदाळे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, ओ.बी.सी शहर अध्यक्ष विकास ननावरे, अनुसुचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष अभिजीत जगताप व इतर सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना महेंद्र सूर्यवंशी (बेडके ) पुढे म्हणाले, २३.७५ टी.एम.सी क्षमता असलेले पुणे जिल्हयातील भाटघर धरण व साधारण ९.८१ टी.एम.सी क्षमता असलेले सातारा जिल्हयातील वीर धरण असे एकूण ३३.५६ टि.एम.सी पाण्यापैकी फलटण तालुक्यातून जाणाऱ्या निरा उजवा कालव्यातून दररोज ५५० क्युसेक्स विसर्ग होतो, त्यापैकी मोजे रावडी कि.मी. क्र. २४/२०० ते राजुरी कि.मी. क्र. ७९/८०० एकूण ४७/६०० कि.मी एवढया अंतरात खरीप, रब्बी उन्हाळा हंगाम मिळून अंदाजे ०१ महिने विसर्ग होत असतो. त्यापैकी प्रतिदिन २३० क्युसेक्स एवढया पाण्याची गळती फक्त फलटण तालुक्यातील भागात होते म्हणजे साधारण ०९ महिन्याच्या कालावधीत ०५ ते ०६ टी.एम.सी पाणी अनेक वर्षे झाले वाया जात आहे. याकरिता प्रथम पाण्याची गळती थांबविणेसाठी अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. गळती थांबविल्यास फलटण तालुक्यातील दुष्काळी भागाला मागेल त्याला लिफ्ट योजनेतून पाणी दिले जाऊ शकते. बागायती भागात अधिक पाणी पाझरल्याने नापीक जमीनीचे प्रमाण वाढू लागले आहे. ज्या निरा उजवा कालव्यामुळे फलटण तालुका बागायती क्षेत्रात मोडला जातो त्याकडे दुर्लक्ष होत असून तालुक्यातील राजकारण पाणी विषयावरुन दोघांच्या भोवतीच फिरले पाहिजे हा उद्देश ठेवून धोम-बलकवडीच्या ०.९३ टी.एम.सी पाण्यासाठी तालुका वेठीस धरला जात असल्याचा आरोप यावेळी सूर्यवंशी (बेडके ) यांनी केला.
फलटण तालुका काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारकडे अस्तरीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामधील साधारणपणे ११ कि.मी. कामाची निविदा निघालेली असून उर्वरित काम निधी उपलब्ध करुन टप्या टप्याने शासनाने पूर्ण करावे अशी मागणी यावेळी सूर्यवंशी (बेडके ) यांनी केली.
ब्रिटीश कालीन निरा उजवा कालव्यावरील फलटण तालुक्यातील एकूण २० ग्रामीण रस्ते जोडणारे अरुंद पुल आहेत. त्या पुलावरील रहदारीचे प्रमाण वाढल्या कारणाने वाहतूकीसाठी अडचण ठरत आहे. तरी यातील अतिआवश्यक असलेल्या १५ पुलांच्या रुंदीकरणासाठी निधी मिळावा म्हणून फलटण तालुका काँग्रेस कमिटी पाठ पुरावा करत आहे असे फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी निदर्शनास आणून दिले.