फलटण दि. १३
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरु असून या वादात तेलंगणा राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, तथापि हा प्रश्न निकाली निघेल यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असून त्यानंतर कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजना मार्गी लावून या भागाचा पाणी प्रश्न सोडविण्याची ग्वाही केंद्रीय जल संपदा मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
आज (सोमवार) रोजी पंढरपूर येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ना. शेखावत बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शहाजी बापू पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान औताडे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सास्ते, राहुल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेण्यातील अडचण दूर करणार
कृष्णा पाणी लवादाच्या निर्णयानुसार एका नदीच्या खोऱ्यातील पाणी दुसऱ्या नदीच्या खोऱ्यात वळविता येत नसल्याने कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजना पूर्णत्वास नेण्यात असलेल्या अडचणी दूर करुन उपलब्ध पाणी वाटपाची फेररचना ब्रिजेशकुमार आयोगाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यासाठी आयोगाचा अहवाल महत्वाचा ठरणार असल्याचे ना. शेखावत यांनी स्पष्ट केले.
९५ कायम दुष्काळी तालुक्यांपैकी ५५ तालुके प. महाराष्ट्रात
राज्यातील ९५ कायम दुष्काळी तालुक्यांपैकी ५५ तालुके पश्चिम महाराष्ट्रात येतात. त्यांना कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजना पूर्ण करुन कृष्णेचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करताना आपण राजस्थान सारख्या तीव्र पाणी टंचाईच्या प्रदेशातून येत असल्याने पाणी टंचाईची जाण आपल्याला असल्याने कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजने बाबत आपण सकारात्मक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा मंत्री ना. शेखावत यांनी केले.
राज्य सरकारची वेळ काढू पणाची भूमिका
नीरा - देवघर पाटबंधारे प्रकल्प राज्याच्या अखत्यारीत असल्याने केंद्रीय जलसंपदा मंत्री या नात्याने आपण २ वेळा पत्रव्यवहार करुन या प्रकल्पाच्या पूर्ततेबाबत असलेल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याबाबत योग्य सहकार्याची केंद्राची भूमिका होती, तथापि हायड्रॉलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांना पाणी बारामती व अन्यत्र वळवायचे असल्याने कदाचित त्यांनी वेळकाढूपणाची भूमिका घेतली, अन्यथा हा प्रकल्प पूर्वीच पूर्ण झाला असता असे मत ना. शेखावत यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्रात आता सकारात्मक निर्णय होतील
आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आपण दिल्लीत बैठक घेऊन कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण योजना आणि नीरा - देवघर पाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी लवकरच योग्य मार्ग काढून येथील कायम दुष्काळी पट्ट्यातील पाण्याचा प्रश्न निश्चितपणे लवकरच मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन ना. शेखावत यांनी केले.
दोन्ही प्रकल्पांची रखडलेली कामे पूर्ण करणार
देशामधील दुष्काळी भागासाठी ठोस उपायोजना करण्याचे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याने महाराष्ट्रातील नीरा - देवधर आणि कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण या दोन्ही प्रकल्पांची रखडलेली कामे तातडीने सुरु होतील असे आश्वासन केंद्रीय जल संपदा मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांनी यावेळी दिले.
संपूर्ण कायम दुष्काळी पट्ट्यात कृष्णेचे पाणी पोहोचविणार
केंद्रीय जल संपदा मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे आपण हायड्रॉलॉजिकल डेटा तपासणी, त्यासाठी हवाई पाहणी करण्याची मागणी केल्यानंतर आज त्यांनी स्वतः नीरा - देवघर पाटबंधारे प्रकल्पातील धारण, लाभ क्षेत्र, धरणापासून ६५ कि. मी. (वाघोशी) पर्यंत झालेल्या कालव्याच्या कामाची, आणि नीरा - भीमा स्थैर्यीकरण योजनेतील सोमंथळी, उद्धट, तावशी येथे नीरा नदीवर उभारलेले बंधारे व भूगर्भातून जाणाऱ्या कालव्यांची पाहणी केल्याचे पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून देत या दोन्ही योजनांबाबत ना. शेखावत सकारात्मक असल्याने आगामी काळात माढा, करमाळा तालुक्यासह संपूर्ण कायम दुष्काळी भागात कृष्णेचे पाणी नक्की पोहोचणार असल्याची खात्री खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.पत्रकार परिषदेपूर्वी ना. शेखावत व मान्यवरांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथे मंदिर समितीच्यावतीने त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
हेलीकॉफ्टर मध्ये नकाशावरुन दुष्काळी पट्ट्याची माहिती घेताना ना. शेखावत. (छाया : अमित साळुंखे, फलटण.)