शरद पवार यांची भूमिका ही नेहमीच महाराष्ट्राच्या हिताची राहिली आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळे पक्षात फुट होवून सुध्दा सामान्य जनता, मतदार शरद पवार यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले - प्रभाकर देशमुख
दहिवडी प्रतिनिनी -
प्रभाकर घार्गे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी देण्याचा शरद पवार यांनी जो निर्णय घेतलाय तो आमच्यासाठी अंतिम आदेश आहे. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे प्रभाकर देशमुख असतील वा प्रभाकर घार्गे निवडणूक ही एकाच ताकदीने लढविण्यात येईल. माण-खटाव मतदारसंघात तयार झालेली परिवर्तनाची लाट अधिक गतीमान करण्यात येईल. या मतदारसंघाला वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न असून मी माझे कार्यकर्ते प्रभाकर घार्गेसोबत असल्याचे दहिवडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रभाकर देशमुख म्हणाले, यावेळी राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके, रमेश शिंदे, लालासाहेब ढवाण आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले, मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. ती पुर्ण न झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. बैठक घेऊन प्रमुख कार्यकर्ते तसेच अधिकृत उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून यापुढे प्रभाकर घार्गे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करण्यासाठी मी स्वतः व पक्षाचे सर्व कार्यकर्ते कार्यरत राहणार असल्याचे देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले.
माण मधील लोकप्रतिनिधी पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात आलाय म्हणतात मात्र प्रश्न समजून घेवून दृष्टीक्षेपात यायला पंधरा वर्ष लागतात का? असा सवाल यावेळी देशमुख यांनी उपस्थित केला.
हिंगणीला पाणी गेल्याशिवाय अर्ज भरणार नाही असे विद्यमान आमदार म्हणाले होते त्यामुळे हिंगणीला पाणी गेले का असा टोला यावेळी देशमुख यांनी लागवतानाच बिजवडीला पाणी एक वर्षात गेलं नाही तर राजीनामा देईन असे आमदार जयकुमार गोरे मागील विधानसभा निवडणुकीत म्हणाले होते, मात्र त्याच पाईपचं पुजन प्रत्येकवेळी केले जात आहे असे देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले.
थापा मारुन लोकांना फसवायचं हे फार काळ टिकणार नाही. उरमोडीचं असो वा टेंभूचं पाणी याचं श्रेय हे खा. शरद पवार यांचं आहे. फुकटचं श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असून तो दुर्दैवी असल्याचे देशमुख म्हणाले. विद्यमान लोकप्रतिनिधींनी मायणी मेडिकलसह विविध प्रकरणात गाजवलेल्या कर्तृत्वामुळे आपला मतदारसंघ सर्वत्र चेष्टेचा विषय झाला असल्याचा टोला गोरे यांना लगावतानाच माण-खटाव मतदारसंघात परिवर्तन निश्चित होईल असा आशावाद प्रभाकर देशमुख यांनी बोलून दाखविला.