फलटण प्रतिनिधी : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या ८ वर्षांत सार्वजनिक विकासाचा ध्यास घेतला असून वैयक्तिक विकासाच्या शेकडो योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. भाजप सरकार गरिबांची काळजी घेणारे सरकार असून सर्वांगीण विकास केंद्रबिंदू मानून काम करणारे सरकार आहे. देशातील सर्व राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही विविध प्रकारच्या विकासकामांची चक्रे गतिमान होताना आज दिसत असल्याचे सांगत सर्वसामान्यांचा हिताचा विचार करून देशात काम करणारे मोदी सरकार हे देशातील पहिले सरकार असल्याचा विश्वास केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.
ना. मिश्रा फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, या दरम्यान आयोजित लाभार्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र लोकसभा प्रभारी व माजी मंत्री बाळा भेगडे, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राम सातपुते, आमदार समाधान अवताडे, आमदार कल्याण शेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, सुशांत निंबाळकर, शेखर लंभाते, शेखर वडने, धनंजय साळुंखे पाटील, अमर निंबाळकर, अशोक जाधव, सचिन अहिवळे, राजेंद्र काकडे, डॉ. गुळवे, डॉ. आगवणे, मनोज कांबळे, माऊली नाळे, सागर अभंग, प्रशांत कोरगावकर, महिला आघाडीच्या नंदिनी सावंत, शुभांगी रासकर, रुपाली कर्णे, मुक्ती शहा, सौ. इंगवले, रत्नमाला हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या भागाचे संसदेत प्रतिनिधित्व करणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्वाधिक केंद्राचा निधी उपलब्ध करून या भागात विविध विकासाची कामे कार्यान्वित केली असून रेल्वे, नीरा देवधर, विविध रस्ते, एमआयडीसी आदींची कामे मार्गी लावली असल्याने या भागातील नागरिकांनी खासदार रणजितसिंह यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन ना. मिश्रा यांनी केले.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर लाभार्थी मेळाव्यात म्हणाले, मोदी सरकार हे देशातील पाणी, रेल्वे, विविध रस्ते, घरकुल या योजनांसह अन्य विविध योजना सर्व सामान्यांना देणारे यशस्वी सरकार ठरले आहे. आगामी काही दिवसात फलटण मधील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना आपण निमंत्रित करणार असल्याचे सांगत नाईकबोमवाडी येथील नियोजित एमआयडीसीच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करणार आहे.
सध्या केंद्राच्या विविध योजना या भागात राबविल्या जात असून केंद्र अंतर्गत जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे. यापूर्वी रोजगार हमी-तुम्ही निम्मी-आम्ही निम्मी असा चालत असलेला कार्यक्रम यापुढे मोदी सरकारच्या काळात चालणार नाही. गोर-गरीब सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना सन्मान देणारे मोदींच्या नेतृत्वाखालील हे केंद्रातील पहिले सरकार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.
दोन दिवसांच्या दौऱ्यात ना. मिश्रा यांनी या तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी दिल्या. यामध्ये कोळकी येथील शासन मान्य स्वस्त धान्य दुकानास भेट, शहरातील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन आरती केली, राष्ट्रीय खेळाडू कुमारी देविका घोरपडे यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. शासकीय विश्रामगृहात (इरिगेशन) आयोजित लोकसभा व विधानसभा कोअर कमिटी बैठक आणि संजय चिटणीस यांच्या निवासस्थानी आयोजित संघाच्या बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
दि. ६ रोजी सकाळी सुरवडी व निंभोरे येथे रस्त्यांच्या कामाची पाहणी, फलटण येथील श्री सद्गुरू हरिबुवा मंदिरात जाऊन दर्शन, मलठण येथील वारकरी भवनच्या विस्तृत इमारतीचे भूमिपूजन, येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहून केंद्रातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लाभार्थींच्या मेळाव्यानंतर मंगळावर पेठेतील भीमस्फूर्ती स्मारकास भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन दौऱ्याचा समारोप करून ना. मिश्रा दिल्लीकडे रवाना झाले.