तत्कालीन मंत्रिपदाच्या कारकिर्दीत रामराजे नाईक निंबाळकर यांना केवळ एका दिवसामध्ये निरा - देवघरचे पाणी आणणे शक्य होते, मात्र लाल दिव्याच्या बदल्यात 14 टी. एम. सी. पाणी बारामतीला वळवण्याचे महापाप रामराजेंनी केल्याचा गंभीर आरोप यावेळी खासदार रणजितसिंह यांनी केला
फलटण तालुक्यात येऊ घातलेल्या निरा-देवघर प्रकल्पामुळे मुळे आता शेती व शेतकरी समृद्ध होणार असून प्रत्येक गावामध्ये पिके आता बहरु लागणार आहेत तर ढवळ भागाच्या शेजारून 50,000 कोटींचा रस्ता जाणार असल्याने या भागातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होणार आहे. तर आपल्या भागात केवळ एकाला श्रीमंत लावायची हौस होती असा टोला आमदार रामराजे यांचे नाव न घेता लगावतानाच आता आपण प्रत्येकाला श्रीमंत करणार असल्याचे अभिवचन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले, ते ढवळ (फलटण) येथील फलटण तालुका संपर्क दौऱ्या दरम्यान बोलत होते.
यावेळी जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, ॲड. नरसिंह निकम, सुशांत निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, बबलू मोमीन, माजी नगरसेवक जाकीर मणेर, विष्णुपंत लोखंडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अमित रणवरे, तुकाराम शिंदे, अंशुमन नाईक निंबाळकर, माऊली चव्हाण, शरद कदम, प्रकाश कदम यांच्या सह मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, निरा देवघर प्रकल्पामुळे आता फलटण तालुक्यामध्ये येणारे पाणी आठ माही होणार असू लवकरच हे येणारे पाणी बारामाही करण्याचा आपला संकल्प आहे. जिल्हा परिषद मध्ये आपल्या पत्नी सौं.जिजामाता ना. निंबाळकर निवडून आल्यानंतर रामराजेंनी या भागातील कॅनॉलची कामे बंद केली होती मात्र आपण स्वखर्चाने या भागात कॅनोलची कामे केल्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी करीत असताना आपल्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करत अनेकांची पळता भुई थोडी केली होती.
पुढे बोलताना खासदार म्हणाले की, तत्कालीन मंत्रिपदाच्या कारकिर्दीत रामराजे नाईक निंबाळकर यांना केवळ एका दिवसामध्ये निरा - देवघरचे पाणी आणणे शक्य होते, मात्र लाल दिव्याच्या बदल्यात 14 टी. एम. सी. पाणी बारामतीला वळवण्याचे महापाप रामराजेंनी केल्याचा गंभीर आरोप यावेळी खासदार रणजितसिंह यांनी केला. मात्र आपण खासदार झाल्यानंतर बारामतीचे पाणी केवळ पंधरा दिवसात बंद केले होते मात्र राज्यात पुन्हा महाआघाडी सरकार आल्यानंतर ते पाणी बारामतीला वळवण्यात आले. सुदैवानेमला केंद्राच्या जलशक्ती कमिटी मध्ये समावेश केल्यानंतर हायड्रोलॉजीचा सर्वे पुन्हा करत चुकीचे निर्णय बदलून निरा - देवघरचे 14 टीएमसी पाणी आपल्या भागातून जाण्याचा मार्ग मोकळा झाला. लवकरच कालवा जोड प्रकल्पाची कामे सुरू होणार असून या भागातील शेतकऱ्यांना तो प्रकल्प पाहण्यासाठी आपण घेऊन जाणार असल्याचे वचन खासदार रणजितसिंह यांनी यावेळी दिले.
नाईकबोमवाडी येथील एम. आय. डी. सी. 1500 एकरात असून तालुक्यातील तरुणांना मोठी रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्नही आता मार्गी असून ग्रामीण रुग्णालयासाठी 65 कोटी रुपयांची मंजुरी झाल्याची माहिती देतानाच फलटण येथे पुढील वर्षी सेशन कोर्ट सुरु होणार असल्याचे सातारा येथे जावे लागणार नाही असे सांगत महावितरणची संपूर्ण डीपीची कामे पूर्ण झाल्याचे यावेळी खासदार रणजितसिंह यांनी निदर्शनात आणून दिले.
माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व करताना खा.शरद पवार यांनी कोणतीही विकासात्मक कामे केले नाही आणि दुष्काळात शेतकरी होरपळत असताना त्याला वाऱ्यावर सोडले त्याच शरद पवारांचा फोटो लावायला आमदार रामराजे यांना लाज वाटत असल्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील सुरवडी स्थित कमिन्स कंपनी च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पगारात भ्रष्टाचार होत असून रामराजें सह त्यांचे बंधू कमिशन घेत असल्याचा आरोप खा. रणजितसिंह यांनी करतानाच कमिन्स कंपनीच्या व्यवस्थापनाकाडे आपल्याला आता लक्ष घालावे लागेल असा इशारा यावेळी खासदार रणजिसिंह यांनी दिला
मुजरा करायचा असेल तर आपल्या आई-वडिलांना करा आपल्या दैवतांना करा छत्रपती शिवाजी महाराजांना करा मात्र कोणत्याही व्यक्तीला मुजरा करू नका असे आवाहन खा. रणजितसिंह यांनी केले.