हायड्रॉलीक रिपोर्ट बदलून पाणी बारामतीला पळविल्याचा रिपोर्ट सी. डब्लू सी ने दिलेला असून सी. डब्लू सी ने दिलेला निर्णय मोठा की बारामती असा सवाल करीत फलटण तालुक्याचे पाणी मंत्रीपदासाठी विकणारा लाचार नेता फलटणला मिळाल्याचा घणाघात आ. रामराजे यांचे नावं न घेता खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. ते फलटण तालुका संपर्क दौऱ्यात तरडगाव येथे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर धनंजय साळुंखे पाटील, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे ,तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, अरुण शेलार, स्वराज पतसंस्थेस चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, अनुप शहा, अतुल गायकवाड, वसीम मणेर, महिला आघाडीच्या पदाधिकारी,फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, बबलू मोमीन मा. नगरसेवक जाकीरभाई मणेर, अनिल ढमाळ, वसंतराव ठोंबरे, यांच्या सह विविध खात्याचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
लवकरच रेल्वेची टेंडर निघतील असे सांगून रेल्वे चालत नाही असे लोकांना भासवण्याचे काम सध्या विरोधक करीत आहेत. यांची जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही असे सांगून गद्दारामध्ये यांच नावं घेतलं जाईल असे गंभीर वकत्तव्य खा. रणजितसिंह यांनी केले.
स्वतःच्या जमिनी सोडवून घेण्यासाठी यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात कामे केली मात्र तुम्हांला शरद पवारांचा फोटो लावायला लाज वाटतेय. फलटण तालुका तुम्हाला जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असे सांगून निवडणूकीला माझ्या समोर या आणि तुम्ही नाही आलात तर बारामतीकरांना आणा असे आव्हान यावेळी खा. रणजितसिंह यांनी आ.रामराजे यांना दिले.
आपण आपल्या कार्यकाळात फलटणसाठी जे शक्य आहे ते करणार असून आपण मात्र अजित दादांशी सेवा केली, अजित दादांनी बारामतीला विकासाचं मॉडेल तयार केले आहे पण तुमची लायकी अजित दादांनी भाषणात काढली होती असे या वेळी खासदारांनी निदर्शनास आणून दिले.
निरा - देवघर चे आपल्या वाट्याचे पाणी बारामतीला दिले होते ते आपण खासदार झाल्यानंतर पुन्हा तालुक्यातील जनतेसाठी आणले. तर फलटणकर शरद पवारचे बूट पुसायला पुढे आहेत मात्र मी जनतेची कामे करूनही मला आपण खलनायक उपादी देताय असे खा. रणजितसिंह म्हणाले.
निरा - देवघरचे काम हे रामराजेंचे एका दिवसाचं होते मात्र त्यानी जनतेला पाण्यासाठी झुलवत ठेवलं व बारामतीची चाकरी केल्याचा खा. रणजितसिंह यांनी आरोप केला.
तरडगाव मध्ये कावीळ मधून 200 ते 250 जणांना बाधा झाली होती. जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने अशुद्ध पाण्यामुळे आजार पसरल्याचे यावेळी तरडगाव येथील नागरिकांनी लक्षात आणून दिले. यावेळी मे महिन्या पर्यंत प्राधिकरण योजना पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
5 वर्षापर्यंत सदर योजना पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे खासदार रणजितसिंह यांनी आदेश दिले अन्यथा अधिकाऱ्यावर कारवाई करावी लागेल असा इशारा यावेळी दिला.
तालुक्यातील विकासासाठी सत्तेचा लोलक हलता ठेवा असे सांगून बारामती चे पळविलेले पाणी पुन्हा खासदार रणजित दादांनी तालुक्यासाठी आणले आहे आपण सभापती म्हणून काय केले? असा सवाल अनुप शहा यांनी उपस्थित केला.
फलटणची रेल्वे कै. हिंदुराव ना. निंबाळकर यांनी आणली मात्र रेल्वे मंजूर झाली तेव्हा जाफर शरीफ नव्हे तर रामविलास पासवान हे रेल्वे मंत्री होते हे सांगून रामराजेच्या चिट्ठीनी कोणाला नोकरीं मिळाली? तर स्वतःची मुलगी व मुलगा यांना असा टोला यावी अनुप शहा यांनी लागवला.
खा. रणजितसिंह यांनी दुसरी एम आय डी सी फलटणला आणली मात्र खासदारांबद्दल संभ्रम निर्माण करणे एव्हडंच काम विरोधकांचे असून दादांनी सकारात्मक काम केले आहे ते काम जनते पर्यंत पोहोचवने आपले काम आहे येणाऱ्या निवडणुकीत आपली भूमिका महत्वाची असल्याचे यावेळी शहा यांनी निदर्शनात आणून दिले.
आजपर्यंत चे फलटण तालुक्यातील राजकारण फक्त पाण्यावर झाले आले. तरडगाव गावात सर्वात जास्त निरा - देवघरच्या पाण्याचा लाभ होणार असल्याचे जयकुमार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. राज्याच्या सरकारमधून तालुक्यातील दुष्काळ संपवण्याचीसाठी निरा - देवघर चा प्रश्न सोडवीला आहे. त्यामुळे आता तालुक्यातील राजकारण थांबवा व विकासाच्या मागे उभा रहा असे आवाहन यावेळी जयकुमार शिंदे यांनी केले.
यावेळी तरडगाव, शिंदेमाळ, विठ्ठलवाडी, चांभारवाडी, कुसूर, आदी भागातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.