नीरा-देवघर प्रकल्पाचे कि. मी. ६६ ते १३० पर्यंत कालव्याऐवजी पाइपलाइनने पाणी देण्याचा निर्णय झाल्याने पाण्याची सुमारे ४ टीएमसी इतकी बचत अपेक्षित असून त्यापैकी ०.९३ टीएमसी पाणी धोम-बलकवडी धरणात टाकण्यात येणार असून उर्वरित ३ टीएमसी पाणी लाभक्षेत्राबाहेर न देता लाभक्षेत्रात प्राधान्याने देण्यात यावे : आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण प्रतिनिधी : नीरा-देवघर प्रकल्पातून बचत होत असलेले ३ टी. एम.सी. पाणी फलटण तालुक्याला मिळावे अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे शासनाकडे करत त्याबाबत शासनाने काय निर्णय घेतला अशी विचारणा त्यांनी केली असता सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्याची ग्वाही ना. फडणवीस यांनी सभागृहात दिली.
नीरा-देवघर प्रकल्पाचे कि. मी. ६६ ते १३० पर्यंत कालव्याऐवजी पाइपलाइनने पाणी देण्याचा निर्णय झाल्याने पाण्याची सुमारे ४ टीएमसी इतकी बचत अपेक्षित असून त्यापैकी ०.९३ टीएमसी पाणी धोम-बलकवडी धरणात टाकण्यात येणार असून उर्वरित ३ टीएमसी पाणी लाभक्षेत्राबाहेर न देता लाभक्षेत्रात प्राधान्याने देण्याची मागणी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
नीरा-देवघर पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन फलटण व खंडाळा तालुक्यात करण्यात आले असून तसेच आतापर्यंत या प्रकल्पाचे पाणी वीर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे या तालुक्यात देण्यात आले असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे अनेक ठिकाणी वीर आणि नीरा-देवघरचे लाभक्षेत्र एकच असल्याने उसाचे वाढते क्षेत्र आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने पाणी देणे आवश्यक असल्याने बचतीचे पाणी या भागात प्राधान्याने दिले पाहिजे अशी आपली आग्रही मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर, सांगोला वगैरे भागाला हे बचतीचे पाणी देण्याची मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी केली असली तरी लाभक्षेत्रातील गरज ओळखून हे पाणी फलटण, खंडाळा, माळशिरस तालुक्यांना मिळाले पाहिजे अशी आपली मागणी असून त्याबाबत शासन काय निर्णय घेणार आहे, अशी विचारणा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील १३ गावे वंचित राहिली आहेत त्यांचा लाभक्षेत्रात समावेश करुन त्यांना बचतीतून पाणी मिळावे अशी मागणी केली.
आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाण्याचा हा विषय क्लिष्ट झाला असल्याचे सांगत निरा देवधरच्या लिफ्टचे पाणी सेव्ह होणार आहे. लक्षवेधीच्या माध्यमातून किती बोलता येईल? आम्हाला बोलण्याची संधी द्या. निरा खोऱ्याचं एकत्रीत चित्र जे रंगवलं आहे त्याच्यावरही माझ्याकडे सोल्यूशन आहे. मात्र ते मला रेकॉर्डवर आणायचं नाही. पश्चिमेकडे निऱ्याच्या खोऱ्यात जाणारे पाणी आपल्याकडे सहज वळवता येईल. तसा प्रस्ताव कृष्णा महामंडळाकडे आहे तो मागवून घ्यावा आणि संयुक्त बैठक घ्यावी ही माझी मागणी आहे असे सांगितले.
यावेळी उपस्थित लक्षवेधीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ टीएमसी पाण्याची बचत होणार असून त्यापैकी ०.९३ टीएमसी पाणी धोम-बलकवडी प्रकल्पात टाकून हा प्रकल्प आठमाही करण्याचा निर्णय झाला असून उर्वरित ३ टीएमसी पाणी पंढरपूर, सांगोला तालुक्यांना देण्याची मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली असून कॅबिनेटमध्ये त्याबाबत तत्वतः निर्णय झाला आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आ. रामराजे यांनी जो काही विषय मांडला त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन. विषय समजून घेईन, अधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिल्या जातील ज्येष्ठ सदस्य व या प्रकल्पांची माहिती असणारे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्याची ग्वाही ना. फडणवीस यांनी सभागृहात दिली. आ. मोहिते-पाटील यांच्या मागणीप्रमाणे लाभक्षेत्राचा विस्तार करुन सदर १३ गावांबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन ना. फडणवीस यांनी यावेळी दिले.