जलसंपदा विभाग कृष्णा - खोरे विकास महामंडळ अंतर्गत माढा तालुक्यातील खैराव - मानेगाव उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाने (PFR ) मंजुरी दिली असल्याची माहिती माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे असे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक वर्ष कायम दुर्लक्षित ठेवलेली सीना नदीवरील भीमा - सिना योजनेतून जोड कालव्याच्या मधून ७३०.४८द.ल.घ.फु इतक्या पाण्याची बचत होत असल्याने सदर पाणी प्रस्तावित खैराव - मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी वापरता येणे शक्य आहे. ही बाब खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर शासनाने या क्षेत्राचे सर्वेक्षण करून खैराव - मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी पूर्व व्यवहार्यता अहवाल PFR तयार करून प्रस्ताव नियामक मंडळा पुढे ठेवला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून बैठक घ्यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार ३१ जानेवारी २०२३ रोजी माढा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली व या बैठकीत उपमुख्यमंत्री यांनी खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या पूर्व्यवहारिता अहवालास PFR तत्वता मान्यता देण्यात आली असल्याचे निर्देश दिले. त्यानंतर महामंडळाकडून खैराव - मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या पूर्व्यवहारिता अहवाल तयार करून शासनाची मान्यता मिळणेसाठी सदर प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्यास आज शासनाने मंजुरी दिली व नियामक मंडळाकडे कार्योत्तर मान्यता घेण्यासाठी साठी पाठवले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या योजना मंजुरीचे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडे सुपूर्द केले. या योजनेमुळे माढा तालुक्यातील ५० वर्षापासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या १२ गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे व या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी संपणार आहे अशी भावना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.
माढा भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या व शेती पाण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे त्यामुळे या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये पुढील निवडणुक ही माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्नावर होणार नाही असा शब्द दिला होता तो आज पूर्ण होताना दिसत आहे. मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या काही जलसंपदा विभागाच्या उपसा सिंचन योजना होत्या त्या सर्व मार्गी लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा दुष्काळी लोकसभा मतदारसंघ म्हणून भविष्यामध्ये ओळखला जाणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
या भागातील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर छोटे मोठे व्यवसायीक तयार होतील व मतदार संघातील तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी आशाही खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले आहेत.