फलटण प्रतिनिधी : फलटणचे माजी आमदार कैलासवासी सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे. सामान्य माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या व्यथा वेदना जाणून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झटणारा तत्त्वनिष्ठ, परखड विचाराचा नेता म्हणूनही ते ओळखले जात होते.अनेकदा त्यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्या त्या सत्राचा सर्वात उत्कृष्ट नेता म्हणूनही गौरवले होते. फलटणच्या गजानन चौकात चिमणरावांची सभा म्हटलं की सर्व रस्ते गर्दीने तुडुंब भरायचे. खरे तर चिमणराव शब्दांचे जादुगार होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्यानंतर असा परखड विचाराचा नेता फलटणला नव्हे तर सातारा जिल्ह्याला लाभला नाही हेही तितकेच खरे.
फलटण विधानसभा मतदार संघातून १९८०,१९८५ व १९९० साली ते विजयी झाले. तर १९९५ साली त्यांना तब्ब्ल ४२३६७ मते मिळाली होती मात्र त्या वेळी त्यांचा पराभव झाला. तब्बल २५ वर्षाहून अधिक काळ चिमणराव कदम फलटणच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. गांधी घराण्याशी जवळचे संबंध जपत राजकीय वाटचाल चिमणराव कदम यांनी सुरू ठेवली होती. एकेकाळी काँगेसची मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्या चिमणराव कदम यांची संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा होत होती.
मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून इतर पक्षात दिसू लागले. एकूण त्यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा सांभाळणारा सक्षम वारस मिळावा नसल्याने त्यांचा राजकीय गट आज जवळपास नामशेष झाल्याचे त्यांचे निकटचे कार्यकर्ते सांगतात.
जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चिमणराव कदम यांनी फलटणच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री गरिबांच्या झोपडीत पर्यंत नेहली. तर गरीब बहुजन वर्गातील अनेकांना चिमणराव यांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर नेहमीच मतांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. उमेदीच्या काळात त्यांचा असणारा दरारा आज पाहायला मिळत नाही.
चिमणराव कदम यांचे चिरंजीव व जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री कदम यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला खरा परंतु ते नेमके कोणत्या पक्षात आहेत हेच मुळी मोठे कोडे आहे. चिमणराव कदम यांच्या सारखा धाक आणि दरारा त्याचबरोबर राजकीय प्रगल्भता नसल्याने साहेबांचा मतदार मात्र आज काळाची पावले ओळखून आपल्या सोयीनुसार इतरत्र दिसू लागला आहे.
एकेकाळी तालुक्यात मोठा दरारा व मोठा मतदार वर्ग असणारा कदम गट सध्या आस्तित्वाची लढाई लढत आहे. चिमणराव कदम यांच्या मागे हजारोंचा गठ्ठा मतदान असणारा गट सध्या अंतर्गत नाराजीमुळे त्रस्त आहे. जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कर्मचारी वर्ग यांच्या जोरावर चिमणराव कदम यांनी राजकीय वाटचाल चालू ठेवली होती पण तीच वाटचाल आता सह्याद्री कदम यांना जपता येत नाही हे स्पष्ट झाले आहे.
कै.चिमणराव कदम यांनी अनेक तरुणांना रोजगार व नोकऱ्या देऊन एक मोठा गट उभा केला होता तो गट सह्याद्री कदम पिढ्यान् पिढ्या न जपता नाराज केला आहे. लोकसभा निवडणूका, विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सर्व निवडणुका अशा अनेक निवडणुका मध्ये सतत भूमिका बदलत कधी या गटात तर कधी त्या गटात अशी विविध पक्ष बदलणारी भूमिका घेतल्याने फलटण तालुक्यांतील चिमणराव कदम यांच्या विचाराला मानणारा वर्ग गटापासून दूर चालला आहे. जो माणूस काळाची पावले ओळखत नाही तो माणूस काळाच्या आड होतो ही कल्पना सह्याद्री कदम यांना होताना दिसत नाही.
कर्मचारी वर्ग व कदम गट यांना मानणारा वर्ग यांना मनापासून जपणे हे कदम गटाच्या पुढील पिढीला न जमल्याने स्वतःला कदम गटाचे किंगमेकर समजणे हास्यास्पद आहे. नको त्या व्यक्तींचे नको ते ऐकणे यामागचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. ज्या सल्लागारांनी तालुक्यांतील अनेक राजकीय घराण्याची राजकीय वाटचाल नको तो सल्ला देऊन संपवल्याने सह्याद्री कदम यांनी वेळीच सावध होऊन ओळखायला हवे आहे असे साहेबांवर प्रेम करण्याऱ्या निष्ठावंत नेत्याने सांगितले. एकंदरीतच सद्यस्थितीत राजकीय परिस्थिती पाहता फलटण तालुक्यात जनतेच्या मनातील अपेक्षित तिसरा पर्याय नसल्याचे दिसत असल्याची खंत अनेक जण व्यक्त करतात.