यंदाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन हे राज्याच्या विकासाला चालना देणारे असे होते, असे प्रतिपादन पालकमंत्री शुभूराज देसाई यांनी केले. सातारा विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यंदा प्रथमच एक महिना पूर्ण वेळ अर्थसंकल्पिय अधिवेशन चालले, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या अधिवेशनामध्ये 17 महत्वाची विधेयके मंजूर करण्यात आली. कांदा उत्पादकांसाठी प्रती क्विंटल 350 रुपयांचे अनुदान, अवकाळी गारपिटग्रस्त भागांसाठी मदतीची घोषणा, दुर्लक्षित आदिवासी पाडे, धनगर वस्ती यांच्या विकासासाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद या अधिवेशनात करण्यात आली. जनतेच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले. काही वेळा सभागृहाचे कामकाज रात्री 12 वाजेपर्यंत चालले. सर्वाधिक लक्षवेधीही मांडण्यात आल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
केंद्राचा जास्तीत जास्त विकास निधी राज्याला मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशिल असून अनेक विभागांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये नगरविकास विभागाला केंद्राचा 19 हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच पाणी पुरवठा, जलसंपदा अशा विभागांना हा निधी मिळणार आहे.