अकलूज / प्रतिनीधी - ईडी, सीबीआय, आयसीबी सारख्या यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणायचा. त्यांना तुरुंगात टाकायचे अशा पध्दतीची हुकूमशाही सध्या देशात सुरु आहे. मोदी गॅरंटी बद्दल नेहमीच बोलतात परंतु या देशातील लोकशाही संपविणे हीच खरी मोदींची गॅरंटी आहे अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांनी केली.
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे प्रचारार्थ अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात आयोजित विशाल सभेत खा. पवार बोलत होते.
खा शरद पवार म्हणाले, उजनी धरणाच्या उभारणीत शंकरराव मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. लोकांच्या हितासाठी साखर कारखाने, दूध संस्था काढल्या. प्रधानमंत्री हा देशाचा असतो . एका राज्याचा नसतो. महाराष्ट्रातील अनेक कंपन्या गुजरातला नेण्याचे काम केले. इडी, सीबीआय, सीआयबी च्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या पदाधिका-याना अडचणीत आणायचे. मुख्यमंत्री केजरीवाल, सोरेन यांना तुरुंगात टाकले. ही हुकूमशाही आहे. या देशातील लोकशाही टिकविण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा.
आ. जयंत पाटील म्हणाले, माढ्यातील निवडणुक जनतेने हाती घेतली आहे. धैर्यशीलच्या उमेदवारीने भाजपाला सळो की पळो करुन सोडले आहे. कारखानदारांना धमक्या दिल्या जातात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जातोय. कारवाईच्या भीतीने नेते घरात आहेत तर जनता रस्त्यावर उतरली आहे आणि हीच जनता यंदा महाराष्ट्रात परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही.
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न सोडवायचा आहे. शेतकरी पाणीदार करायचा आहे. फलटण - पंढरपूर व रत्नगिरी - कराड - पंढरपूर रेल्वे मार्ग सुरु करायचा आहे. केळी संशोधन केंद्र सुरु करायचे आहे. नीरा उजवा कालव्याचे पुर्वी प्रमाणे नियोजन करायचे आहे. सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या स्वाभीमानासाठी मी रात्रंदिवस झटेन.
उत्तम जानकर म्हणाले, सत्याहत्तर हजाराच्या घोटाळ्यातील कावळ्याला चूना लावून बगळा करण्याचे काम भाजपाने केले आहे. त्यांनी चंद्र सूर्य सोडून सर्वकाही देण्याचे आश्वासन मला दिले.
परंतु गेल्या दहा वर्षात त्यांनी मला इतके फसविले की माझा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही म्हणून मी विमानातून उडी टाकून पवार साहेबांना भेटलो. आता माढ्याची खासदारकी पवार साहेबांच्या पायावर घालुनच थांबेन.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, भुषणसिंह होळकर, युवक अध्यक्ष महिबुब शेख, माजी आ. आर. जी. रुपनवर, काकासाहेब साठे, जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, डॉ बाबासाहेब देशमुख, डॉ अनिकेत देशमुख, नितेश कराळे, नगराध्यक्षा मिनल साठे, बाळासाहेब धाईंजे, संजय पाटील घाटणेकर, साईनाथ अभंगराव, नामदेव वाघमारे यांच्यासह हजारो नागरीक या विशाल सभेस उपस्थित होते.