ऊसाच्या पट्ट्यात ऊस संशोधन संकूल उभारण्यात येत आहे. मांढदरदेव रस्त्याचा प्रस्तावही प्राधान्याने पाठविण्यात यावा
सातारा दि. 12 : कृषि क्षेत्रामध्ये आज रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करु या असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. शिरवळ येथील मंगलमूर्ती इव्हेंट सर्व्हिसेस आयोजित सह्याद्री राज्यस्तरीय भव्य कृषी व पशु प्रदर्शन 2023 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तहसिलदार दशरथ काळे, शिरवळचे सरपंच शिवराज दुधगांवकर, उपसरपंच ताहेरभाई काझी, पळशीचे सरपंच हेमाताई गायकवाड, कोल्हापूरचे माजी महापौर सागर चव्हाण, खंडाळ्याचे माजी सभापती राजेंद्र तांबे, आयोजक संदीप गोळे, आदी उपस्थित होते.
कृषी क्षेत्रात नाविण्यपूर्ण यंत्र, लागवड पध्दती, बीयाणे, खते याविषयी रोज नवीन संशोधन होत असल्याचे सांगून, पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, हे संशोधन व नाविण्यपूर्ण अवजारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम अशा कृषी महोत्सवांच्या माध्यमातून होते. आपल्या जिल्ह्यात अनेक साखर कारखाने आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी ऊसाच्या पट्ट्यात ऊस संशोधन संकूल उभारण्यात येत आहे. मांढदरदेव रस्त्याचा प्रस्तावही प्राधान्याने पाठविण्यात यावा. जिल्ह्यातील विकास कामांसाठी मी नेहमीच कटीबध्द आहे. कृषी महोत्सवासारख्या उपक्रमांसाठी शुभेच्छा देतो व या उपक्रमाचा फायदा शेतकरी व उद्योजकांना नक्कीच होईल अशी आशा व्यक्त करतो.
कार्यक्रमाच्या सुरवातीस पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनाची पहाणी केली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन मुख्य सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. नितीन पाटील यांनी सूत्र संचालन केले तर आयोजक संदीप गोळे यांनी आभार प्रदर्शन केले.