सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याचे जाहीर केले. परंतु, स्व. यशवंतराव चव्हाण, पी.डी पाटील साहेबांचा वारसा सांगणाऱ्या सहकारमंत्र्यांनी सहकाराची भूमिका घ्यायला हवी. मात्र, तेच भक्षकासारखे वागत असून त्यांनी आपण सहकारमंत्री आहोत; की सह्याद्रीचे चेअरमन हे आधी स्पष्ट करावे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर शरसंधान साधले.
कराड : सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याचे जाहीर केले. परंतु, स्व. यशवंतराव चव्हाण, पी.डी पाटील साहेबांचा वारसा सांगणाऱ्या सहकारमंत्र्यांनी सहकाराची भूमिका घ्यायला हवी. मात्र, तेच भक्षकासारखे वागत असून त्यांनी आपण सहकारमंत्री आहोत; की सह्याद्रीचे चेअरमन हे आधी स्पष्ट करावे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर शरसंधान साधले.
येथील शासकीय विश्रामगृहात चालू ऊस गळीत हंगामातील एफआरपीप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोमवारी दि.25 रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. शेट्टी म्हणाले, कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, सातारा-सांगली-सोलापूर जिल्ह्यातील कारखादारांना मस्ती आली आहे. दस्तुरखुद्द सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याच्या गोष्टी करणे ही निंदनीय बाब आहे. सातारा जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती. मात्र, त्याला सहकारमंत्र्यांनी खो घातला असावा, अशी टीकाही त्यांनी यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर केली. तसेच त्यांना सहकारमंत्र्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची वेळ आली असल्याचा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी यावेळी दिला.
खा. शेट्टी पूढे म्हणाले, दहा वर्षात पहिल्यांदाच साखरेला सुवर्णकाळ आला आहे. त्यामुळे बाजारभावानूसार एफआरपीपेक्षा जादा सादर कारखानदारांनी देणे अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात महापूर, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अशा काळात एक रक्कमी एफआरपी न देता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी फिरवण्याचे कामही सहकारमंत्र्यांनी केले असल्याचा आरोपही खा. राजू शेट्टी यांनी यावेळी केला.
साखर उद्योग अडचणीत असताना आम्ही नरमाईची भूमिका घेतली. मात्र, आता सुवर्णकाळ असताना आम्ही गप्प बसणार नाही. राज्यातील जे-जे साखर कारखाने एक रखमी एफआरपी देणार नाहीत, त्या कारखान्यांची ऊस वाहतूक अडवून आम्ही कारखाने बंद पाडू, असा इशारा देत आंदोलनात ज्या संघटना आमच्या सोबत येतील; त्यांना बरोबर घेऊन हा लढा देणार असल्याची माहितीही खा. शेट्टी यांनी दिला.
केंद्र सरकार शेतकर्यांच्या आंदोलनाला जातीय, प्रांतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. अदाणी, अंबानींना शेतकऱ्यांना लुटता यावे, असे तीन कायदे त्यांनी मंजूर केले. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले असून त्याला देशभरातील शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शेतकरी मागे हटणार नाहीत.