भारतीय जनता पक्षाचे पुणे येथील खासदार गिरीश बापट यांचे काल दिनांक 29 मार्च रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कै. गिरीश बापट व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे घट्ट मैत्रीचे नाते सर्वश्रुत आहे. जवळच्या व्यक्तीने जगाचा निरोप घेणे अनेकांच्या जिव्हारी लागते हे वेगळे सांगायला नकोच.
खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या समाजकारण व राजकारणातील एक योद्धा हरविल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती.
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा 8 एप्रिल रोजी वाढदिवस साजरा होत असतो. याच निमित्ताने दिनांक 27 मार्च रोजी खासदार गिरीश बापट यांनी रामराजे यांना वाढदिवसाला शुभेच्छापर संदेश पत्र पाठविले होते मात्र ते पत्र रामराजे यांच्या फलटण येथील लक्ष्मीविलास पॅलेस या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच खासदार गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
आज रामराजे यांना गिरीश बापट यांचे पत्र मिळाले त्या पत्रात गिरीश बापट म्हणतात, दिनांक 8 एप्रिल आपला वाढदिवस येतो, उगवता सूर्य आपणाला आशीर्वाद देवो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो, जीवनात आनदाच्या क्षणांना उजाळी देतो, आयुष्याला योग्य दिशा देतो, जीवन किती सुंदर आहे हे हळूच कानात सांगून जातो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो देव आपणास उदंड आयुष्य देवो...
अशा प्रकारचे शुभेच्छा पत्र पाहताच आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना हुंदका दाटून आल्याचे रामराजे यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसद्वारे सांगत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
कै. गिरीश बापट यांच्या विषयी मनातील भावना व्यक्त करताना आमदार रामराजे आपल्या व्हाट्सअप स्टेटस मध्ये म्हणतात, आज आपल्या शुभेच्छा चे पत्र पाहून बापट साहेब मनामध्ये हुंदका दाटून आला. काल आपले निधनाची बातमी समजता खूप धक्का बसला आपल्या आत्म्यास शांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. आपली भारतीय संस्कृती ही खूप जुनी आणि त्यामुळेच समृद्ध आहे, आपल्या सभोवतालच्या लोकांच्या सुखा दुःखात आपण भारतीय लोक नेहमी सहभागी असतो, एकमेकांच्या सुखात आपण एकमेकांना शुभेच्छा देतो आणि एकमेकांच्या दुःखात आपण एकमेकांना धीर देत असतो, एकूणच आपण एकमेकांना सांभाळून घेत असतो आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार.......